पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत मिलेट रॅलीमधे नोंदविला सहभाग…
कोल्हापूर – पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत २२ मार्च रोजी मौजे कुर ता. भुदरगड येथे मिलेट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या मिलेट रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी – कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर, रोटावेटर चे वाटप केले.
या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगत आहारात नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन इ. सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त असल्याचे सांगितले . शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल त्यांचे अनुभव कथन केले. तर ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मयत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरी पत्र देण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनंतर्गंत फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या पौष्टिक तृणधान्ये महोत्सवामध्ये पाककला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सुमारे 150 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. अनुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन महिलांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील (कोल्हापूर विभाग) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती रक्षा शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले (अशासकीय सदस्य) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई. अजित देसाई, माजी उपसभापती(भुदरगड) मदन पाटील, कुरचे सरपंच कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे, अशोकराव भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन किरण पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज, नितीन भांडवले, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड, सुनील कांबळे आत्मा (बीटीएम) यांनी नियोजन केले. या कार्यशाळेस शेतकरी, प्रक्रियादार, नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दर्शविला.