“प्रवास केवळ अंतराचा नसतो... तो विश्वासाचा असतो”
– अशोक कुचकोरवी यांची यशोगाथा
(स्पेशल पॉझिटिव्ह वाचन या डिजिटल मीडियाशी थेट संवाद- शेखर धाेंगडे- टीम लिडर)
“सुरुवात अपयशाने झाली, पण जिद्देनं पुढे गेलो. प्रत्येक अडथळा पायरी ठरली. प्रवास लांबचा होता, पण मनाशी जोडलेला होता… म्हणून तो यशस्वी झाला.” – अशोक कुचकोरवी
प्रश्न: अशोकजी, ट्रॅव्हल्स व्यवसायात यायच्या आधीचा तुमचा प्रवास कसा होता?
अशोक कुचकोरवी: मी व्यवसायात शालेय डिग्री घेऊन नाही, तर अनुभवाच्या शाळेतून आलोय. वयाच्या २०–२१व्या वर्षीपासूनच काहीतरी “स्वतःचं” करायचं हे मनाशी ठरवलं होतं. भंगार व्यवसाय केला, बेकरी सुरू केली, जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री केली, केबल एजन्सी चालवली – जे जे जमेल ते करून पाहिलं. त्यात थोडंसं यशही मिळालं, पण तेव्हा व्यवसाय प्रतिष्ठेचा आहे की नाही, याचा विचारच केला नाही. कारण मला फक्त ‘बिझनेसमन’ व्हायचं होतं. यानंतर एका परिचिताच्या सांगण्यावरून ट्रॅव्हल्स व्यवसायात पाऊल ठेवलं. पण सुरुवातीलाच मोठा फटका बसला. अनुभव नव्हता, माहिती नव्हती – आणि पहिलाच टप्पा अपयशाचा ठरला. मोठा तोटा झाला. पण मी हार मानणाऱ्यातला नव्हतो. प्रश्न: अशा वेळी अनेक जण गारद होतात. तुम्ही मात्र उभे राहिलात. कसं? अशोक कुचकोरवी: मनात एकच गोष्ट ठरवली — “आता करून दाखवायचंच!” अनेकांनी मला दुर्लक्ष केलं, दुय्यम वागणूक दिली, हा व्यवसाय माझ्यासाठी नाहीच असं ठरवलं. काहींनी तर आडवे अडथळे उभे केले. पण मी मागे हटलो नाही. या व्यवसायातील बारकावे, कायदे, धोरणं, आणि काम करण्याच्या पद्धती – एकेक गोष्ट मी स्वतः शिकत गेलो. आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा आठवतं — ते दिवस जेव्हा बँका, फायनान्स कंपन्याही आमच्या नावाने दूर राहत होत्या. “कसला व्यवसाय? कशावर विश्वास ठेवायचा?” असा त्यांचा सूर असायचा. पण आज? आज त्या सगळ्या संस्था स्वतःहून व्यवसाय वाढीसाठी पुढाकार घेतात. विश्वासाने मदतीचा हात पुढे करतात. प्रश्न: कार्तिक ट्रॅव्हल्सच्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली? अशोक कुचकोरवी: २०१४ मध्ये दोन जुन्या बसेस घेऊन सुरूवात केली. हातात पैसा नव्हता, पण मनात मोठा विश्वास होता. कुठलाही बॅकअप नव्हता, पण ‘आपलं काहीतरी असावं’ ही आग होती. व्यवसाय म्हणजे फक्त नफा नाही, तो एक जबाबदारीचा प्रवास असतो — आणि तो मी चालायला सुरुवात केली. प्रश्न: एवढ्या मोठ्या बस व्यवसायामागे खरा आधार कोणाचा आहे? अशोक कुचकोरवी: मी नाममात्र मालक आहे, पण व्यवसायाची खरी ओळख माझे चालक, वाहक, कर्मचारी व मदतनीस आहेत. एक चालक जेव्हा स्टेअरिंग हातात घेतो, तेव्हा त्याच्या खांद्यावर पन्नास-साठ जणांचा जीव असतो. त्यांचा आत्मविश्वास, समज, संयम — हेच कार्तिक ट्रॅव्हल्सच्या यशाचे खरे इंजिन आहे. प्रवासी सुखरूप पोहोचले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले — तर वाटतं, मी काहीतरी चांगलं केलंय. हीच माझी कमाई. प्रश्न: ऑफिसमधील टीमचं योगदान कसं वाटतं? अशोक कुचकोरवी: व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, तांत्रिक समस्या, बुकिंग, प्रवाशांचा फीडबॅक — या सर्व गोष्टींमध्ये ऑफिस टीमचा समन्वय खूप महत्त्वाचा आहे. मी एकटा काहीच करू शकलो नसतो. संवाद, विश्वास आणि सुसंवाद — या त्रिसूत्रीवर आमचं कार्यालय चालतं. प्रश्न: या प्रवासात सर्वात कठीण टप्पा कोणता होता? अशोक कुचकोरवी: व्यवसायातले नियम, कधी बदलणारे कायदे, महामार्गावरील कॅमेऱ्यांद्वारे होणाऱ्या अयोग्य दंडात्मक कारवाया, हे खूप त्रासदायक असतं. अनेकदा वाटतं, ‘का करतोय हे सगळं?’, पण लगेच डोळ्यासमोर येतात आमचे कर्मचारी, त्यांची कुटुंबं, आणि प्रवाशांचा विश्वास — मग पुन्हा जोशाने उभा राहतो. प्रश्न: या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वही तुम्ही निभावत आहात… अशोक कुचकोरवी: हो, कोरोना काळात अनेक गरजूंना मदत केली. गरिबांना अन्न, प्रवाशांना सवलती, धार्मिक व सामाजिक उपक्रमांना साथ दिली. आम्ही प्रसिद्धी नको, पण माणुसकीचं नातं जपायचं हे ठरवलेलं आहे.
प्रश्न: भविष्यासाठी तुमचे संकल्प काय आहेत? अशोक कुचकोरवी: कार्तिक ट्रॅव्हल्सचा ताफा अधिक तंत्रसुसज्ज करायचा आहे. प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित, आरामदायक करायचा आहे. चालक व कर्मचाऱ्यांसाठी अधिक प्रशिक्षण, कल्याणकारी योजना राबवायच्या आहेत. माझं स्वप्न आहे की प्रवाशांना कार्तिक ट्रॅव्हल्स म्हटलं की विश्वास, सुरक्षितता आणि सेवा यांचं प्रतीक वाटावं. प्रश्न: शेवटी, तुम्ही नवोदित उद्योजकांना आणि सामान्यांना काय संदेश द्याल?
“प्रवास लांबचा असो वा छोटा… जेव्हा तो मनाशी जोडला जातो, तेव्हाच तो यशस्वी होतो.” कार्तिक ट्रॅव्हल्स म्हणजे केवळ वाहतूक व्यवसाय नाही — तो एक विश्वासाचा सेतू आहे, जो शून्यातून उभा राहिलेला, आणि माणसांच्या प्रेमावर टिकलेला आहे.
|