अभ्यास व उपाययोजनांची गरज
शिराळा ( जी.जी.पाटील)
चांदोली परिसरासह शिराळा, कराड ,शाहुवाडी, वाळवा आदी तालुक्यात बिबट्यांचे व गव्यांचे वारंवार दर्शन होऊ लागले आहे.बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्लेही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. तर गव्याकडून पिकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.अशातच नुकतेच रिळे येथील पाच गव्यांचा विषबाधेने मृत्यू तर चव्हाण वाडी येथील बिबट्याचा संशयास्पद मृत्यू यामुळेच मानव व वन्यप्राणी संघर्ष आता टोकाला गेल्याचे पहायला मिळत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात तर दररोज कोठे ना कोठे तरी बिबट्याचे दर्शन होत आहे तर अनेक ठिकाणी तो पाळीव प्राण्यांना भक्ष करत आहे.गेल्या वर्षभरात १०७ पशुधनावर हल्ले झालेत.
अलीकडे मानवावर ही तो आक्रमण करू लागला आहे.उखळू येथील शाळकरी मुलावरील हल्ला, उदगिरी येथील मुलीचा मृत्यू,बिऊर येथील ऊसतोड मजूराच्या मुलाचा मृत्यू तर गव्याच्या हल्ल्यात काळुंद्रे येथील शेतक-याचा मृत्यू यासह गवे ,रानडुक्कर यांच्याकडून शेतीपिकांचे भयानक नुकसान होत आहे.काही भागातील शेतक-यानी पिके घेणेच बंद केलेय शेकडो एकर शेती पडून आहे.यामुळेच वन्यप्राणी व मानव यांचा संघर्ष आता टोकाला जावूनच विषबाधेचे प्रयोग होत असलेची चर्चा भागात दबक्या आवाजात होत आहे.
१. गवे व बिबट्यांचा अभयारण्या बाहेरील वावर यामुळेच कुंपनाचा प्रश्न ऐरणीवर
२.तालुक्यातील १०७ पशुधनावर गतवर्षीपासून हल्ले
३.अभयारण्यातील अन्न साखळी कमकुवत मुळे वन्यजीव बाहेर
३.वन्याप्राण्याकडून शेतपिकाचे नुकसानशेकडो एकर शेती पडून उदरनिर्वाह करायचा कसा
खरेतर चांदोली अभयारण्यातील वन्यप्राण्यांची अन्नसाखळी मजबूत होण्याऐवजी ती कमकुवत झालीय. अन्नाच्या व पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्या बाहेर पडतात.त्याना अभयारण्यातच मुबलक प्रमाणात खाद्य व पाण्याची व्यवस्था झाली तरच मानव ववन्यप्राणी संघर्ष कमी होईल अन्याथा दिवसेंदिवस संघर्ष वाढतच जाईल यात शंका नाही.
सध्या या बिबट्यांचे पाळीव प्राणी तसेच मानवावरील होणारे हल्ले सध्या चिंतेचा विषय बनू लागला आहे. बळीराजाचेही पाळीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत मिळत आहे. मात्र कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मानवी वस्ती मध्ये गवे व बिबट्यांचा वाढलेला वावर प्राण्यांवर तसेच मानवावर होणारे हल्ले याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने तज्ञांची समिती नेमून यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यामध्ये मानव व वन्यप्राणी यांचा संघर्ष वाढतच जाणार आहे.याचा वन्यजीव व वनविभाग यानी गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे.
वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये… तहसिलदारांना भेटले ग्रामस्थ