10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त…
कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य
कामातील अत्याधिक दबावामुळे चैन्नईतील 38 वर्षीय साफ्टवेअर इंजिनीअर कार्तिकेयनने विजेचा शॉक घेऊन आत्महत्या केली. कंपनीच्या अतिरिक्त कामामुळे 26 वर्षीय ॲना पेरायलचा मृत्यू व नुकतेच नागपुर येथील एका आयटी कंपनीच्या शौचालयात कामाच्या तणावामुळे 40 वर्षीय नितीन मायकलचा हृद्यविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू. या अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला, वाचायला व पहावयास मिळतात. या सर्व घटनांचा विचार करता जागतिक आरोग्य संघटना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य’ व जागतिक मानसिक आरोग्य संघटना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ’ असे विषय घेत यावर्षीचा जागतिक मानसिक आरोग्य दिन (10 ऑक्टोबर) साजरा करत आहे.

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाची घोडदौड अतिशय वेगाने सुरू आहे. त्यावर प्रत्येकजण स्वार होण्याचा प्रयत्न करतो आहे. दररोज नव्याने होत चाललेले आधुनिकीकरण, तांत्रिकीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण, बेरोजगारी, महागाई, कामाची अनिश्चितता, कौशल्यांचा अभाव, मंदीचे सावट व त्यावर अवलंबून असणारे नोकरीची शक्यता यामुळे अनेक पटीने मानसिक समस्या वाढलेला दिसून येतात. घरी आले तरी कार्यालयांतील काम मात्र मनातून जाता जात नाही. गटबाजीचे राजकारण, भेदभाव, टार्गेट, सहकाऱ्यांची आडमुठी भूमिका, रात्रपाळी, आर्थिक ओढाताण इत्यादी अनेक आ वासून पुढे येणा-या प्रश्नांमुळे, विचारांमुळे मनावर खूप मोठे ओझे घेवून वावरत राहतो. यापाठोपाठ येतो तो मानसिक थकवा. भावनिक आणि शारीरिकरित्या थकल्यासारखे वाटणे, कामापासून अलिप्तता, वैयक्तिक सिद्धीची कमी झालेली भावना आणि कामातील रस कमी होणे हे बर्नआउटचे लक्षण असू शकते. डब्लूएचओ ने 2019 मध्ये बर्नआऊटचा समावेश इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजच्या यादीत केला आहे. जो दीर्घकालीन कामाच्या अतितणावामुळे निर्माण होतो. प्रत्येकाला काळ अन् वेळेनुसार स्वतःलाच बदलावे लागते. परिस्थिती बघून वागावे लागते. पण प्रत्येकाला ते जमतच असं नाही मग सुरू होते ती मानसिक घुसमट, मानसिक एकटेपणा, भावनाशून्यता, चिंता, ताण-तणाव आणि बरचं काही. मग प्रश्न उभा राहतो तो मानसिक आरोग्याचा. ज्याविषयी अलीकडे बोललं जातंय, विचार केला जातो. काही जण यातून लिलया बाहेर पडतात, काही यातच गुरफटून जातात, तर काही टोकाचे पाऊल उचलतात.
इंडियन जर्नल ऑफ सायकॅट्रीमध्ये दोन संशोधनात्मक लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. पहिल्या लेखामध्ये 2022 मध्ये भारतीय कर्मचा-यांमधे असणारे नैराश्य, चिंता व ताण याचे प्रमाण जाहीर केले. त्यामध्ये 29 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचे नैराश्य, 55 टक्के कर्मचा-यांमध्ये मध्यम ते तीव्र प्रमाणात चिंता व 78 टक्के कर्मचारी हे मध्यम ते उच्च प्रकारचा ताणवात असल्याचे आढळून आले आहे. दूस-या लेखात 12 उद्योगांमधील 3995 कर्मचा-यांच्या मानसिक आरोग्याचा सर्वे दिला आहे. यात नैराश्यग्रस्त कर्मचारी 59 टक्के, थकवा 55 टक्के, चिडचिड 55 टक्के, चिंता 49 टक्के तर झोपेची समस्या असणारे कर्मचारी 51 टक्के असल्याचे निदर्शनास आले. संशोधकाने यामागची मूळ कारणे- कामाच्यासंबंधीत तणाव, आर्थिक ताण, कोविड-19 संबंधित घटक, कौटुंबिक व सामाजिक घटक असल्याचे स्पष्ट केले आहे. कर्मचा-यांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या ह्या जागतिक स्तरावर 52 टक्के आहे. तर भारतात 69 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
शेवटी “कामाच्या ठिकाणी ताण” म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने कामाच्या वातावरणात अनुभवलेल्या शारीरिक, सामाजिक आणि भावनिक अडचणी. परस्पर संबंध, नियंत्रणाचा अभाव, काम-जीवन असंतुलन, नोकरीची असुरक्षितता आणि संस्थात्मक बदल यासारख्या विविध कारणांमुळे कर्मचा-यांवर परिणाम होऊ शकतो. उत्पादनावर ही विपरित परिणाम होतो. यावर अचूक उपाय म्हणजे मानसिक आरोग्य सदृढ बनविण्यासाठी दररोज व्यायाम, सकस आहार, योगा. याचबरोबर नवनवीन कौशल्य आत्मसात करणे, सहकार्याची भावना, वेळेत काम पूर्ण करणे इत्यादी बाबींवर काम केल्यास कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. कामाचे ठिकाण आनंदी व उत्साही राहू शकते आणि उत्पादन वाढीत वाढ होवून सर्वांचे जीवन सुखी व समुद्धी बनू शकते.