|
काेल्हापूरः TEAM WATCH — कृषी पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात आयोजित करण्यात आलेला मिलेट व फळ महोत्सव २०२६ हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट नातेसंबंध अधिक दृढ करणारा, आरोग्यदायी आहाराची जाणीव करून देणारा आणि कोल्हापूरच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीला नवा आयाम देणारा उपक्रम ठरत आहे. ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २२ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटी हॉल येथे रंगणार असून, कोल्हापूरकरांसाठी ही एक आगळीवेगळी खाद्यपर्वणी ठरणार आहे. राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले मिलेट्स, त्यापासून तयार विविध पदार्थ तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू यांसारख्या फळांची थेट विक्री या महोत्सवात होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताजे, दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरातील उत्पादने मिळणार असून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सुनील फुलारी (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र तसेच डॉ. जस्मिन मॅडम (भा. प्र. से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू असणाऱ्या या महोत्सवात विविध तृणधान्ये, त्यांचे पदार्थ आणि फळांची आकर्षक मांडणी पाहायला मिळणार आहे. यासोबतच आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी डॉ. सदिप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेस बन आणि डॉ. प्रतिभा थोंबरे या आहारतज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. महिलांसाठी मिलेट्सवर आधारित पाककृती स्पर्धा हेही महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार असून पारंपरिक धान्यांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. तसेच रायपूर (छत्तीसगढ) येथील मिलेट आहारतज्ञ कृष्ण मोहन यांचे २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मिलेट पदार्थ तयार करण्याबाबत प्रबोधनपर सत्र आयोजित करण्यात आले आहे. ही बातमीही जास्त वाचली गेली.. पहा लिंक “शेतकऱ्यांच्या गरजांना न्याय देणाऱ्या बाजार समित्यांची गरज”- सुभाष घुले
करवीर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी, स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन कृषी पणन विभागाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी वर्ग तसेच शेतकऱ्यांनी केले आहे. ही बातमी वाचा... आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – दीपक केसरकर |




























































