शिवाजी विद्यापीठात एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न…
कोल्हापूर – सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होत असते. त्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग शिक्षण शास्त्र सभागृहात आयोजित ग्राहक कार्यकर्ता एक दिवसीय कार्यशाळावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहोकारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. आर. जी. पवार, महाराष्ट्राचे ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्याचे कोषाध्यक्ष सुनिता राजे घाटगे, कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रविण खोत, ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष बी.जे. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदरगे, सतिश फणसे, जिल्हा संघटक सुरेश माने, कोषाध्यक्ष अशोक पोतनीस, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पोवार व जिल्हा सचिव दादासो शेलार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ग्राहकांनी आपली होणारी फसवणूक टाळण्यासाठी वस्तू खरेदी करताना वस्तू खरेदी केलेल्याची पावती घ्यावी, जर भविष्यात खरेदी केलेल्या वस्तुवर क्लेम करावा लागला तर त्यावेळी आपल्या कडे पुरावा असणे आवश्यक आहे, याची काळजी ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, या ग्राहक पंचायतीचे काम हे समाजासाठी सेवेचे व ग्राहकांना दिशा देणारे आहेत. स्वर्गीय बिंदु माधव जोशी यांच्या मांडलेल्या विचारातून ग्राहकांसाठी देशभरात व राज्यभरात ही चळवळ संघटक झाली. समाजासाठी अहोरात्र ग्राहकांना वेगवेगळ्या माध्यमातून जागृतीच काम या ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून होत असून याची व्याप्ती अजून वाढवावी जेणेकरुन समाजासाठी अधिक उपयुक्त होईल. ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूबाबत जर ग्राहकांची तक्रार असेल तर त्या ग्राहकाला लवकर न्याय मिळेल यासाठी या ग्राहक पंचायत चळवळीचे काम अधिक गतिमान करावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी राज्य शासन आपल्या पाठीशी आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले, ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता, तक्रार निवारण, संरक्षण इत्यादी बाबींची त्यांना माहिती देणे आवश्यक आहे. अशा या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्राहकांना फसवणूक आणि गैरव्यवहारांपासून संरक्षण मिळेल व ग्राहक अधिक सक्षम होण्यास मदत होईल. या ग्राहक पंचायत चळवळीचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी ग्राहक पंचायतींना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
या एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता कार्यशाळेचे प्रास्ताविक महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले. या कार्यशाळेची सुरुवात स्वर्गीय बिंदु माधव जोशी व स्वामी विवेकांनद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली. यावेळी ग्राहक जनजागृतीपर पार पडलेल्या निबंध स्पर्धेतील निवड झालेल्या उमेदवारांनी पशस्तीपत्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या कार्यशोळेसाठी ग्राहक पंचायतीचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.