शासकीय तंत्रनिकेतनमधील 30 वा पदविका प्रदान समारंभ 2025 अंतर्गत 371 विद्यार्थ्यांना पदविकांचे वितरण
कोल्हापूर – जीवनात काहीतरी बनण्याचे स्वप्न बाळगून शिक्षण घेतल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या असे आवाहन विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनमधील 30 व्या पदविका प्रदान समारंभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, स्वत:चे असे वेगळे व्यक्तिमत्त्व तयार करून तुमच्या क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करा. ज्ञान, शिक्षण आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी गुंतवणूक करा व यातून एक विशिष्ट अशी उंची गाठा. निश्चितच आपले आयुष्य बदलेल. शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे झालेल्या पदविका प्रदान समारंभावेळी सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे तथा अध्यक्ष, नियामक मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर डॉ. दत्तात्रय जाधव, विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक, सुयश कास्टींग प्रा.लि. एमआयडीसी शिरोलीचे जयकुमार पारिख, प्राचर्य तथा सदस्य सचिव, नियामक मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर कॅप्टन डॉ.नितीन सोनजे यांचेसह नियामक मंडळाचे सर्व सदस्य व विभाग प्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सर्व स्नातकांचे अभिनंदन करून पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, ऐतिहासिक कोल्हापूर शहरात शिक्षण घेत आहात. ज्ञानार्जन करीत असताना कष्ट केले, आता नवअभियंते म्हणून बाहेर जाल. ही वेळ, हा काळ पुन्हा येणार नाही. आता केलेल्या चुकाही तुम्हाला पुन्हा दुरूस्त करता येणार नाहीत. चुका टाळून पुढे जात रहा. अपयशाला मित्र समजून पुढे जा आणि यशाला गवसणी घाला. या प्रक्रियेत कुठेही आत्मविश्वास कमी पडू देवू नका. पदविका प्रदान समारंभापुर्वी विद्वतसभा सदस्यांची मिरवणूक झाली. कार्यक्रमस्थळी नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय जाधव यांनी समारंभाची उद्घोषणा केली. उपस्थित स्नातकांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात स्थापत्य, यंत्र, विद्युत, माहिती व तंत्रज्ञान, धातुशास्त्र, अणुविद्युत व दुरसंचार या विभागातील पाच पाच विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली.
कार्यकारी संचालक जयकुमार पारिख यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतामधून पुढिल वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एक स्वप्न पुर्ण झाले पण ही खऱ्या अर्थाने सुरूवात आहे. शिकत राहा आणि समोरच्याला व्यवस्थित ऐकायला शिका. कारण यातून आयुष्यातील महत्त्वाचे ज्ञान मिळत असते. शिक्षण व ज्ञानाचे भुकेले आपण कायम असले पाहिजे. चुका सुधारून स्मार्ट बना. नवीन एआय प्रणाली आत्मसात करून बाजारातील आपली किंमत वाढवा. सुरूवातीला प्राचर्य कॅप्टन डॉ.नितीन सोनजे यांनी वार्षिक अहवाल 2024-25 सादर केला. त्यामध्ये त्यांनी प्रस्तावना, अधिकारी कर्मचारी यांचे योगदान व विशेष प्राविण्य, विद्यार्थ्यांसाठीच्या सोयीसुविधा, प्लेसमेंट, संस्थेने मिळविलेले प्राविण्य यासह जमाखर्च सादर केला. यावेळी त्यांनी उच्च व तंत्र-शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, संचालक डॉ. विनोद मोहितकर यांचे संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये मुख्य योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.डी.मालपुरे यांनी केले तर प्रसिद्धी समितीचे कामकाज अमोल पाटील, विजय माणगावकर यांनी पाहिले.