महसूल कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठी गैरसोय
हातकणंगले, प्रतिनिधी – तालुक्यात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
या संपाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असून, महसूल कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, जमीन नोंदी यांसारखी अत्यावश्यक कामे रखडली आहेत. अनेक नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असून यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, जुनी पेन्शन योजना लागू करणे ही त्यांची प्रमुख मागणी असून सध्याच्या नव्या पेन्शन योजनेमुळे भविष्यात आर्थिक असुरक्षितता निर्माण होत आहे. याशिवाय अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण प्रचंड वाढला असून त्याचा थेट परिणाम सेवा देण्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप या संपावर कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने संप किती दिवस चालणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, तातडीने तोडगा काढून सेवा सुरळीत सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.























































