त्रैभाषिक काव्यसंध्येने इचलकरंजी हरवून गेलं रसिकांची टाळ्यांची उधळण, कवितेच्या मैफिलीने मंत्रमुग्ध क्षण…
इचलकरंजी – इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्रैभाषिक कवी संमेलनाने शहरात शब्दांचे, भावना आणि हास्याच्या तरंगांचे अद्वितीय मेघमालय तयार केले. मराठी, हिंदी व उर्दू या तीनही भाषांतील प्रथितयश कवींच्या सादरीकरणांनी रसिकांची मनं जिंकली. श्रीमंत नारायणराव घोरपडे घोरपडे नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मंचावर मान्यवरांचं तेज आणि माईकवरून झिरपणाऱ्या कवितांच्या ओळींनी संपूर्ण वातावरण भारून गेलं.
या कवी संमेलनाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त आणि कवयित्री सौ. सुषमा शिंदे-कोल्हे होत्या. कार्यक्रमाचे सुत्रत्र संचालन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हे संपूर्ण संमेलनाचा प्राण ठरले. त्यांनी आपल्या टायमिंगने, विनोदाने आणि रसग्रहणशक्तीने चार तास रसिकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सुरुवात व्याकूळ गोयंका यांच्या दमदार हिंदी रचनेने झाली. त्यानंतर प्रा. रोहित शिंगे यांनी आपल्या भारदस्त आवाजात शायरी सादर करत “कविता म्हणजे अनुभवांची ठिणगी असते” हे दाखवून दिलं. मुजावर मालेगाव यांनी एम.ए. बी. ए.तू .ही मै हु जंगली बबुल ” – कैसे तेरा बाप मुझे करेगा कबूल “या शेरांमधून हास्याची खळखळ उडवली. कपिल शर्मा यांनी साळी-साली च्या विनोदी कवितांनी ‘दैनंदिन जीवनात हास्य शोधता येतं’ हे दाखवून दिलं. विद्या पोळ यांनी आपल्या सशक्त मुक्तछंद कवितांनी व्यासपीठ भारले.
उर्दू शायरीचं सौंदर्य उलगडताना महेशर आफ्रिदी यांनी “जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते ही”- हमारी खुश नासीबी ही की हम भारत में रहते है म्हणत उर्दूची मोहकता दाखवली. सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी देखील आपल्या खास शैलीत उर्दूच्या नजाकतीने रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचा शिखरबिंदू ठरला – ‘सुषमा शिंदे-कोल्हे’ यांचा दमदार कविता सादरीकरण आणि नंतर आलेल्या ‘किशोर कदम’ यांचा सलग एक तास चाललेला रसिकांशी संवाद. शब्दांच्या लाटांवर त्यांनी श्रोत्यांना अलगद तरंगवलं. टाळ्यांचा कडकडाट काही केल्या थांबत नव्हता. या कार्यक्रमासाठी दै.महासत्ता, दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, पाटणी कन्स्ट्रक्शन, फॉर्च्युन प्लाझा, उर्दू साहित्य अकादमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट, मनोरंजन मंडळ व सर्वोदय विद्या केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखाधिकारी विकास खोलपे, मुख्य लेखापरीक्षक आरती पाटील, माजी नगरसेवक, पत्रकार बंधू-भगिनी आणि इचलकरंजीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा. आयुक्त विजय राजापुरे यांनी केले. आजचा हा कवी संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे कविता, कवी, आणि रसिक यांच्यातील नात्याचा एक सुंदर सोहळा ठरला.