बारावीचा निकाल: गुणांपेक्षा मुलं मोठी…!
✍️ प्रमोद तौंदकर – उद्या बारावीचा निकाल लागणार… प्रत्येक घरात उत्सुकता, थोडीशी धडधड, अपेक्षा आणि स्वप्नांची गर्दी. गेल्या वर्षभरात फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर पालकांनीही तितक्याच मेहनतीने हा प्रवास केला आहे—रात्रीची जागरणं, क्लासेस, अभ्यासाचा ताण आणि भविष्याची स्वप्नं. पण या सगळ्या धावपळीत आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरत चाललो आहोत.
“मार्क म्हणजे आयुष्य नाही, आणि परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं मोजमाप नाही.”
उद्या जर आपल्या लेकराला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, तर घरात शांतता नको… समजूत हवी.
टोमणे नकोत… आधार हवा.
राग नको… संवाद हवा.
कारण तो १७–१८ वर्षांचा जीव आधीच घाबरलेला असतो.
“मी आई-बाबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही” ही भावना त्याला आतून पोखरत असते. आणि अशा वेळी आपणच जर त्याला दूर केलं, तर तो एकटाच पडतो… आणि कधी कधी अघटित घडतं.
लक्षात ठेवा…
“तुमचं लेकरू ‘मार्क्स’ नाही…
ते तुमचं स्वप्न आहे, तुमचं भविष्य आहे, तुमचा अभिमान आहे.”
आंध्रप्रदेशमधील एका वडिलांचा आदर्श आपल्यासमोर आहे. मुलगा नापास झाल्यावर त्यांनी रागावण्याऐवजी पार्टी ठेवली आणि म्हणाले, “आज तो नापास झाला असेल, पण जीवनाच्या परीक्षेत तो नक्की जिंकेल.” याउलट, काही ठिकाणी रागाच्या भरात घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्यभराची खंत देऊन जातात. एका घटनेत, कमी गुणांमुळे वडिलांनीच आपल्या लेकराचा जीव घेतला—आणि आता उरला आहे तो फक्त पश्चाताप… जो कधीच भरून निघू शकत नाही.
म्हणूनच…
उद्याचा निकाल काहीही असो—तो “सेलिब्रेट” करा.
मुलाशी बोला… त्याला मिठी मारा…
त्याच्या गालावर एक किस घ्या…
डोक्यावरून प्रेमाने हात फिरवा…
“एक प्रेमळ शब्द, एक समजूतदार स्पर्श—एखादं आयुष्य वाचवू शकतो.”
चला, निकालाचा नाही…
आपल्या मुलांच्या आयुष्याचा उत्सव साजरा करूया! ✨
— प्रमोद तौंदकर
📞 9421201290























































