अस्सल आंब्याचा अनुभव… ‘उत्पादक ते ग्राहक’
सांगली – उन्हाळा आला की आंब्याचा सीझन सुरू होतोच, पण यंदा सांगलीकरांना फक्त आंबा खरेदीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या घामातून आलेल्या या ‘फळांच्या राजाशी’ थेट नातं जोडण्याची संधी मिळणार आहे! महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “सांगली आंबा महोत्सव २०२५” चे आयोजन ८ ते १२ मे दरम्यान वसंतदादा स्मृतिभवन, वसंत मार्केट यार्ड येथे करण्यात आले आहे.
या पाच दिवसीय महोत्सवात उत्तम प्रतीचे, नैसर्गिकरित्या पिकवलेले हापूस व केशर आंबे थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून ग्राहकांना मिळणार आहेत. कोणतेही मध्यस्थ नाहीत, कोणतीही शंका नाही – फक्त अस्सल आंब्याचा अनुभव! ‘उत्पादक ते ग्राहक’ या अभिनव संकल्पनेतून शेतकरी स्वतः त्यांचा माल विक्रीस ठेवणार आहेत. उद्घाटन समारंभ ८ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थितीत मंगेश सुरवसे (जिल्हा उपनिबंधक), डॉ. सुभाष घुले (उपसरव्यवस्थापक, कृषी पणन मंडळ), सुजय (नाना) शिंदे (सभापती, बाजार समिती) यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात फक्त आंब्याचं प्रदर्शन नाही, तर सांगली बाजार समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी विश्वासार्हतेचा एक नवा सेतू उभारण्यात येणार आहे. सभापती सुजय नाना शिंदे यांनी सांगितले की, “हा महोत्सव म्हणजे फक्त चविष्ट आंब्यांचा मेळा नसून, शेतकऱ्याच्या कष्टांची थेट पोहोचणारी सन्मानाची संधी आहे. सांगलीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा.”