43 वा स्थापना दिन उत्साहात… डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते केक कापून ४३ वा स्थापना दिन साजरा
कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची 42 वर्षांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने आतापर्यंत सुमारे 25 हजार अभियंते घडवले असून ते आज भारतासह जगभर विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, याचे फार मोठे समाधान वाटते, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 43 व्या स्थापना दिन कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते केक कापून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ते म्हणाले, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी 1984 मध्ये कसबा बावडा येथे सुरू केलेल्या ग्रुपच्या या पहिल्या महाविद्यालयाने प्रगतीचे उच्चांक गाठले आहेत.
डॉ. पाटील म्हणाले, केवळ 240 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज 5 हजार 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने मोठी प्रगती केली आहे. उत्कृष्ट शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे नजीकच्या काळात आणखी वेगाने प्रगती करुया असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, गुणवत्तेच्या बळावरच महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ (वॉशिंग्टन अॅकॉर्ड) हे प्रतिष्ठेचे मानांकन अलीकडेच मिळाले आहे. त्याचबरोबर ‘नॅक’ मानांकन, तसेच युजीसीकडून स्वायत्ततेचा दर्जा मिळाला आहे. यापुढे आणखी चांगली प्लेसमेंट, संशोधन, इनोव्हेशन या माध्यमातून महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
स्वागत आणि सूत्रसंचालन रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी केले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी आभार मानले. यावेळी अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सीएचआरओ श्रीलेखा साटम, डॉ. महादेव नरके, अभय जोशी, डॉ. अद्वैत राठोड, प्रा. रविंद्र बेन्नी यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

























































