100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन
कोल्हापूर – जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सहकार दरबारमध्ये सहकार अनुषंगिक एकुण 173 तक्रार अर्ज, यात ऑनलाईन 110 तर प्रत्यक्ष 63 तक्रार अर्ज दाखल झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. यावेळी विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी, अर्जदार उपस्थित होते. यावेळी सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीही भेट दिली.
यावेळी आबिटकर म्हणाले, लोकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी सांगितलेल्या उणिवा याबाबत विचार करून भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्या. दाखल अर्जांचे वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा. आपण पुन्हा आलेल्या तक्रारींवरील उत्तरांसह त्यांच्याकडे जावू. धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू. भारतासारख्या कृषिप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. शेतकरी, कारागीर, लघुउद्योजक, महिला बचतगट, सहकारी बँका, दूध संघ यांसारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे. या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा, यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. येत्या काळात राज्यस्तरावरही अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व विश्वास निर्माण होईल असे श्री.आबिटकर म्हणाले. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल. सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा चळवळीला सहकार दरबारासारख्या उपक्रमांमधून मिळणारे पाठबळ हे तिचे मुळ बळ आहे. प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम यांनी केले. त्यांनी सहकार दरबार हा राज्यातील पहिलाच नाविण्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगून यामध्ये गुगल लिंक द्वारे अर्ज स्विकारणे, क्यूआर कोडचा वापर करणे तसेच व्यापक स्वरूपात प्रसिद्धी केल्याने सर्वसामान्यांना याठिकाणी मदत मिळण्यास सोपे होईल असे सांगितले. या उपक्रमावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कार्यालय अधीक्षक मिलींद ओतारी यांनी केले.
सावकारीतून होणाऱ्या फसवणुकीवर पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे
आजही ग्रामीण तसेच काही शहरी भागात खासगी सावकारांचा विळखा आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गावर घट्ट बसलेला आहे. गरजूंना तातडीची मदत हवी असते, पण बँका किंवा अधिकृत संस्थांकडून त्वरित कर्ज न मिळाल्यास ते खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. ही आर्थिक गुलामी तोडण्यासाठी पोलीस विभागाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अशा प्रकारची सावधगिरी घेतल्यास सामान्य माणसांचा न्यायावरचा विश्वास वाढेल आणि आर्थिक शोषणाला आळा बसेल. सहकार आणि पोलीस विभागाने अनाधिकृत सावकारीवर नियंत्रण ठेवून गोरगरीबांना न्याय द्यावा. हा घटक सहकाराशी संबंधित असल्याने सावकारीबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला पाहिजे अशा त्यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या.
सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या बॅजचे अनावरण
सहकार दरबार उपक्रमावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आयोजित केले जात आहे. यानिमित्ताने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या बॅजचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले.