जिल्ह्यातील प्रत्येक गावात या अभियानाची होणार प्रभावी अंमलबजावणी
कोल्हापूर – ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच लोकांमध्ये स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणणे, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करुन वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने दि. १ मे ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ अभियान राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
गावात बांधकाम करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करुन खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू ..!’ अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहे. दि. १ मे ते दि. ३० सप्टेंबर २०२५ (३१ मे, ३०जून, ३१जुलै, ३१ऑगस्ट, १५ सप्टेंबर असे एकूण १३८ दिवस) पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर घरगुती व सार्वजनिक स्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे दि. २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. १ मे २०२५ ला ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ या मोहिमेचा शुभारंभ होणार असून यावेळी स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहेत. १ मे ते दि. १० मे या कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेपमध्ये भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत नाडेप मध्ये तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया होईल. हे अभियान राबविण्याबाबत अति. अभियान संचालक यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना राज्य स्तरावरील व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन केले आहे. यामध्ये अभियानाची पुर्वतयारी व नियोजन याबाबत माहिती देण्यात आली आहे. अभियानाची पडताळणी – १३८ दिवसाच्या ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !’ या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरुन प्रकल्प संचालक, जजीमि तथा जिल्हा समन्वयक स्वभामि (ग्रा.), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुका स्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कचऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्ड्याची पडताळणी करतील.
प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान – जास्तीत जास्त गावामध्ये ही मोहीम राबविण्यासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या या अभियानाची प्रचार, प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व समाज माध्यमां (सोशल मिडीया) मध्ये करण्यात येणार असून यशोगाथा प्रकाशित करुन इतर गावांना याव्दारे प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे. अभियानाची सूचना व पुर्व तयारी – राज्यस्तरावरुन मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, सोसायटी, तलाठी सज्जा, सार्वजनिक सुचना फलक याठिकाणी या अभियानाची प्रसिध्दी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.