कोल्हापूर जिल्ह्यातील समाधी समितीच्या सदस्यांसोबत बैठक
कोल्हापूर – करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील समाधी स्थळाच्या जिर्णोद्धार कामाच्या आराखड्याचा प्रस्ताव या महिन्याभरात राज्य शासनाला सादर करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
महाराणी ताराराणी यांच्या संगम माहुली येथील समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराणी ताराराणी समाधी जिर्णोद्धार समितीचे निमंत्रक विजय देवणे, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, शाहीर राजू राऊत, संजय पवार, उदय नारकर तसेच शिव, शाहू प्रेमी व इतिहास प्रेमी उपस्थित होते. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पुरातत्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच या नवीन आराखड्याचे वास्तुविशारद आदी दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या या नव्याने करण्यात आलेल्या आराखड्याचे काम मोठ्या स्वरुपाचे असल्यामुळे हे काम दोन टप्प्यात व्हावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून गड किल्ले संरक्षणासाठी असलेल्या तीन टक्के निधीतून पहिल्या टप्प्यात समाधी स्थळाचे संरक्षण व्हावे. त्यानंतर समाधी स्थळाचा जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे उर्वरित काम हाती घ्यावे. हे काम गतीने मार्गी लावण्यासाठी सुमारे 26 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या आराखड्याच्या कामाचा नवीन प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करुन याबाबत पाठपुरावा करा. तसेच आराखडा अंतिम होण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील समाधी समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे जतन व संवर्धन होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येत आहे. जुन्या प्रस्तावात बदल करुन सुमारे 26 कोटींचा आराखडा सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने सादर करण्यात येणार आहे.
या समाधीचे संरक्षण व नूतनीकरण आराखड्याबाबतच्या कामाचा प्रस्ताव या महिन्याभरात शासनाला सादर होण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून नवीन आराखडा तयार करण्यापूर्वीच्या टप्प्यांची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी समाधी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्या बाबतची माहिती विजय देवणे यांनी बैठकीत दिली.