“बाबासाहेबांना प्रेरणास्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात प्राविण्य मिळवावे” – प्रवक्ते संतोष पाटील
सांगली :(रुपेश आठवले )/चांदणी चौक, आप्पा कासार झोपडपट्टी, माळी थिएटरजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी ते म्हणाले, “सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केंगार दरवर्षी सामाजिक भान राखत बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे. यंदाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांसह छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, ही उपक्रमाची एक नवी सुरुवात आहे.”
“या भागातील गोरगरीब कुटुंबांतील मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे यासाठी पालकांनी कोणत्याही अडचणींचा सामना करूनही मुलांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ देऊ नये. एक वेळ उपाशी राहा, देवाला नारळ फोडू नका, बकऱ्याचा बळी देऊ नका, पण मुलांच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू देऊ नका. त्यांच्यावर चांगले संस्कार करा आणि त्यांना सुसंस्कारित, जबाबदार नागरिक बनवा.”
“बाबासाहेब आंबेडकर यांना सदैव प्रेरणास्थानी ठेवून विद्यार्थी अभ्यासात सातत्य ठेवून नवनवीन क्षेत्रात प्राविण्य मिळवोत आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देोत,” असे उद्गार त्यांनी काढले.
या प्रसंगी प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, खोडरबर इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केंगार यांनी उपस्थितांचे स्वागत करून सत्कार केला. कार्यक्रमाला आमसिद्ध कट्टीमनी, महावीर पाटील, बाबा वाडीकर, मारुती ऐवळे, आदर्श केंगार, विश्वजीत पाटील, गजानन मोरे, गोटू सूर्यवंशी सर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.