राख्या सीमेवरील सैनिकांच्या चार कॅम्पकडे पाठविण्यात येणार
गारगोटी प्रतिनिधी – रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनिक धागाही आहे, ही भावना जपत गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी राखी निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत तब्बल ७ हजार राख्यांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्यांमधून सर्जनशीलतेसोबतच देशसेवेची भावना आणि जवानांप्रती आदर व्यक्त केला. गारगोटी हायस्कूलची ही समाजाभिमुख आणि देशप्रेमाची परंपरा दरवर्षी जपली जाते. या राख्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांपर्यंत पाठविण्यात येतात. यावर्षीही या ७ हजार राख्या सीमेवरील सैनिकांच्या चार कॅम्पकडे पाठविण्यात येणार आहेत. सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आपल्या हाताने तयार केलेली राखी पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. “तुम्ही सीमेवर आमचे रक्षण करता, आम्ही प्रेमाची राखी तुमच्यापर्यंत पोहोचवतो,” असा भाव या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
सदरची राखी निर्मिती कार्यशाळा सौ. सुनीता पाटील, प्रा. सौ. रोहिणी निकम, प्रा. सौ. स्नेहा साळोखे, सौ. एल. आर. पाळेकर, सौ. राजवी साठे, सौ. सुजाता पाटील, श्रावणी मोरे आदी महिला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची भावना रुजविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











































































