‘विचारधन’ ग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
कोल्हापूर – लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे ‘विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१’ या डॉ. विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के , प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे की सातारा येथे असावे याविषयी दुविधा त्यावेळी होती. मंत्रीमंडळासमोर याविषयीचा प्रस्ताव येणार असल्याचे समजताच प्रकृतीअस्वास्थ्य असतानाही बाळासाहेब देसाई हे त्या बैठकीसाठी पोहोचले आणि त्यांनी स्वतः साताऱ्याचे असतानाही कोल्हापूर येथेच विद्यापीठ होण्यासाठी आग्रह लावून धरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर या तीन बाबी त्यांच्या श्रध्दास्थानी होत्या. गोरगरीबांच्या मुलांच्या कल्याणाच्या तसेच शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे विचार आणि वारसा यांची जाणीव ठेवून वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असून विद्यापीठातील देसाई अध्यासनाला अधिक चांगले स्वरुप देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तर मंत्री आबिटकर म्हणाले, आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तीगत स्वार्थ मोठा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईंसारखे निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात. माझे चुलते खटाव येथे होते, ते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या आठवणी ते आम्हाला सांगायचे. आज मी त्यांच्या नातवासमवेत काम करतो आहे, याचा मला मनस्वीः आनंद आहे, असेही ते म्हणाले. जेष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेतृत्वाच्या विचारांचे दस्तावेजीकरण या निमित्ताने संकलित करता आले. त्यांचे कार्य मोठे आहे. देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली. प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता. अत्यंत अभ्यासू, संयमी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत स्वरुपाचे आहे. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. या कृतज्ञतेपोटीच त्यांनी कदाचित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे होण्याविषयी ठाम राहिले.
प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंत्री शंभुराज देसाई व प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संयुक्तरित्या ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी प्रास्ताविक तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विश्वनाथ पानस्कर, अशोकराव पाटील, जयराज देसाई, राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.