एसबीआय बँकेच्या सीएसआर फंडातून दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप
कोल्हापूर – दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सर्व साहित्याचा त्यांनी चांगल्या रितीने उपयोग करावा. या उपकरणांच्या सहाय्याने त्यांनी अधिक प्रगती करावी. एखादी व्यक्ती दिव्यांग असली तरी त्याच्याकडे विविध गुण असतात. हे गुण महत्वाचे असून वेगवेगळ्या क्षेत्रात या गुणवत्तेच्या आधारे ते यशस्वी होत आहेत. आपल्या अपंगत्वावर मात करून आपल्याकडे असणाऱ्या क्षमता अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्व पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीम्को), समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रम एस.बी.आय. बँकेच्या सी.एस.आर. फंडातून आयोजित करण्यात आला होता. या शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते फित कापून रोटरी क्लब कोल्हापूर येथे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार, भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी सुजाता इंदुलकर, कमलेश यादव जुनिअर मॅनेजर अलीम्को मुंबई, किरण पावरा अल्मिको मुंबई, अतुल जोशी संस्थापक, सचिव, कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ कागल व अमेय अतुल जोशी समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, कोल्हापूर हे उपस्थित होते. यावेळी दिव्यांगाना ऑपरेटेड तीन चाकी सायकल, तीन चाकी सायकल, जॉय स्टिक ऑपेराटेड व्हील चेअर यांचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री श्री.आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेचा दिव्यांग विभाग, अम्लिको, जिल्हा पुनर्वसन केंद्र या सर्वांनी एकत्रित मोहिमेव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासनाकडून मिळणारी मदत कमी पडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दिव्यांगाना तालुका स्तरावर दिव्यांग दाखले मिळण्यासाठी जीआर काढण्यात आला. याव्दारे तालुकास्तरावर सर्व तपासणी करण्यात येईल. जेणेकरुन दिव्यांगांना सतत जिल्ह्याला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. सर्वांनी एकत्रित मिशन मोडवर काम करुन जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना त्यांचे साहित्य, दिव्यांगांच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया.