कृषी विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पौष्टिक तृणधान्य महोत्सव…
कोल्हापूर – पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विभाग, कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन 2024-25 योजनेअंतर्गत शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता मौजे कुर, ता. भुदरगड येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सव 2025 पौष्टिक तृणधान्य रॅली व ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, ग्राहक तृणधान्यांचे संघ, विक्रेते, उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.
भारत तृणधान्य उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आशियातील 80 टक्के म्हणजेच सुमारे 170 लाख टन तृणधान्यांचे उत्पादन आपल्या देशात होते. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर लघु तृणधान्य पिकांची आहारातील उच्च पोषकतत्वे विचारात घेता भारतीय राजपत्रात या पिकांना पौष्टिक तृणधान्य म्हणून घोषित केले आहे. 2018 हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले होते. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज बनली आहे. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह, कॅल्शियम, झिंक,आयोडीन इ. सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्य आधारित पदार्थांचा वापर दररोजच्या आहारात वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनातून व मुल्यवर्धनातून कोरडवाहू, आदिवासी भागातील शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याची या क्षमता पिकांमध्ये आहे. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये जीवनशैली विषयक वाढत असलेले आजार नियंत्रण करण्याची क्षमता देखील या पिकांमध्ये आहे.
या महोत्सवा अंतर्गत सकाळी 9 वाजता कुर- दारवाड- म्हसवे- गारगोटी- कुर या मार्गावर मिलेट बाईक रॅली रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता श्रीराम मंगल कार्यालय, गारगोटी- कोल्हापूर रोड, कुर, ता. भुदरगड येथे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा ऊस पिक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास सुरेश माने-पाटील, निवृत्त वरीष्ठ शास्त्रज्ञ व्ही.एस.आय. पुणे, डॉ. योगेश बन प्रकल्प प्रमुख व पिक पैदासकार, मिलिंद पाटील, प्रगतशील मिलेट उत्पादक शेतकरी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील व कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व इ. बाबीचा लाभ मिळणा-या शेतकरी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रम स्थळी पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया उत्पादनांचे स्टॉल लावुन विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग कोल्हापूर येथील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.