तीर्थक्षेत्राच्या आणि परिसराच्या विकासासाठी तब्बल १४४५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर
कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर विकासासाठी मंजूर झालेल्या ऐतिहासिक निधीमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असून, हा कोल्हापूरच्या वैभवाचा नवा अध्याय ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
अंबाबाई मंदिर आणि परिसर विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता मेळाव्याबाबत बोलताना खासदार महाडिक म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाने कोल्हापूरच्या श्रद्धास्थानासाठी तब्बल १४४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा ज्या पद्धतीने विकास झाला, त्याच धर्तीवर आता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास होणार आहे.
ते म्हणाले की, मंदिर परिसरात पार्किंग, स्वच्छता, अन्नछत्र, भाविकांसाठी निवास व्यवस्था आणि इतर अत्याधुनिक सुविधा निर्माण होणार असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होईल. यामुळे धार्मिक पर्यटन वाढून स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे. कोल्हापूर शहराच्या आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दि. २० रोजी पोलीस मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृतज्ञता मेळाव्यास नागरिकांनी आणि अंबाबाई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही खासदार धनंजय महाडिक यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.























































