८० टक्केच्यावर मतदान झाल्यास एक विक्रम प्रस्थापित होईल
कोल्हापूर: औद्योगिक विकास महामंडळाने एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व त्यांच्याकडील सर्व कामगारांचे जास्तीत जास्त मतदान होईल याबाबत तसेच कारखान्यांमध्ये मतदानाची जनजागृती करणेसाठी उपक्रम राबवणे संदर्भात मार्गदर्शन करणे बाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सामूहिकरीत्या 80 टक्केपेक्षा अधिक मतदान कोल्हापुरातुन करून, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात एक नंबर येण्याचा संकल्प करू या असे आवाहनएमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी केले आहे.
नोडल ऑफिसर [ स्वीप ] तथा मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडून सार्वत्रिक विधानसभा निवडणूक – २०२४ चे अनुषंगाने महाराष्ट्र सबक मतदान जनजागृतीचा कार्यक्रम शिरोली येथील स्मॅक भवनमध्ये पार पडला. यावेळी या बैठकीस स्मॅक चेअरमन सुरेन्द्र जैन , कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक , शिरोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थित होती.
सुरेन्द्र जैन यांनी स्वागत प्रास्ताविक करत, या बैठक आयोजनामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. २० नोव्हेंबर व मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्वांनी आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधून सर्वाधिक मतदान करण्यात आले होते , यासाठी स्मॅकच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अभिनंदन करण्यात आले होते. सर्वांनी आपल्या बरोबर आपल्या नातेवाईकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. स्मॅक आयटीआय च्या माध्यमातून सुद्धा मतदानासाठी जनजागृती केली जाईल असे जैन यांनी स्पष्ट केले.
एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख म्हणाले की आपली लोकशाही बळकट व्हायला हवी.यासाठी निवडणुकांमध्ये मध्ये शंभर टक्के मतदान करावे.. मागील विधानसभेला ७४ टक्के मतदान झाले होते , यावेळी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत ८० टक्के मतदान करण्याचा संकल्प करूया. कोल्हापूर हा जागृत जिल्हा आहे. जर या वेळी ८० टक्केच्यावर मतदान झाले तर एक विक्रम प्रस्थापित होईल, ज्याद्वारे कोल्हापूरचे नाव महाराष्ट्रात आणि भारतात जाईल. सर्व उद्योजकांनी स्वतः सह त्यांच्या सर्व कामगारांचे व जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांनी आपापल्या स्तरावर बैठक आयोजित करून मतदानाची जनजागृती करावी. हे काम एकट्याचे नसून यासाठी सामूहिक प्रयत्नातून हे घडणार असेही देशमुख यांनी सांगितले. यासाठी कारखाना स्तरावर आपण वेगवेगळे छोटे उपक्रम राबवू शकता. जसे की मतदान करून आल्यानंतर त्याच्या बोटावरील शाही तपासून त्याला एखादे गुलाबाचे फुल अथवा पेन देणे , कुटुंबा समवेत ग्रुप फोटो कडून त्याचे एकत्रीकरण करून त्याचा एक अल्बम्ब तयार करावा.
प्रशासनाने जनजागृतीसाठी काही कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यामध्ये दिनांक १५ नोव्हेंबरला लोकशाही दोड , ८० टक्क्यांचे लक्ष साधण्यासाठी इचलकरंजी ते कोल्हापूर यादरम्यान ८० किलोमीटरची सायकल रॅली , शालेय स्तरावरून मतदारांना जनजागृतीसाठी पत्रे लिहिण्यात येत आहेत, एफएम रेडिओ , एसटी स्टँड , विमानतळ , रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणाहून मोठया प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाचा मतदर शिक्षण आणि निवडणुकीत सहभाग वाढवण्यासाठी एक प्रमुख कार्यक्रम स्वीप व अपंग लोकांसाठी [ पीडब्ल्यूडी ] सानुकूलित सेवे बदल ही देशमुख यांनी माहिती दिली.सर्वांच्या सहभागातून हा स्वीप कार्यक्रम यशस्वी करूया असे ही ते म्हणाले.
आय. ए. नाईक म्हणाले की मतदानासाठी नवनवीन पद्धतीने आपल्या कामगारांना प्रवृत्त करावे. आपल्यासह आपल्या कामगारांचे शंभर टक्के मतदान व्हावे हे एमआयडीसीच्या पुढाकार घेऊया.
यावेळी खजानिस बदाम पाटील , ऑ. सेक्रेटरी भरत जाधव , संचालक राजू पाटील , अतुल पाटील , शिखर कुसाळे , निमंत्रित सदस्य किरण चव्हाण , दीपक घोंगडी , आयटीआय चे प्राचार्य प्रसन्न वरखेडकर , अण्णासो हसुरे , उद्योजक अजिंक्य तळेकर , विविध कंपन्यांचे एचआर स्वप्निल जाधव , उमेश सावंत , प्रकाश जाधव , एस. एस. कुंभार , एस. एस. खोत , एस. टी. पाटील , अनिल दुकाने , ईश्वर श्रीमुंडलिकर , सागर निंबाळकर , बी. जी. काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी सुनिल गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले, तर आभार प्रदर्शन भरत जाधव यांनी केले.