विनायक जितकर
जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत अभियंत्यांची तांत्रिक कार्यशाळा व शेतकरी संवाद
कोल्हापूर – जिल्ह्याच्या विकासात धामणीचाही समावेश होणार असल्याने हा आनंदाचा क्षण सर्वासमवेत अनुभवता येणार आहे. नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण होत असून यापुढे अडचण होणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आज, राई येथील धामणी प्रकल्प येथे जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत अभियंत्यांची तांत्रिक कार्यशाळा व शेतकरी संवाद सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, आज माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. धामणी मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पडसाळी, राई, राई-1 व राई-2 वसाहतीमधील पुनर्वसित गावठाण नागरी सुविधांचा लोकार्पण आज झाले. धामणीमुळे नागरिकांची पाण्याची आस्था व श्रध्दा पूर्ण होत असून यापुढे अडचण होणार नाही. यंदाच्या दिवाळीतील अभ्यंगस्नान धामणीत नक्की करणार आहे. पूर्णत्वास येणाऱ्या या प्रकल्पास सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिकांचे यावेळी त्यांनी आभार मानले. प्रकल्पग्रस्त व शेतकरी यांच्याशी संवाद साधला.
कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी धामणी प्रकल्प अभियंत्यासाठी पर्यावरणाशी अभ्यासपूरक असून याचा लाभ घ्यावा. या प्रकल्पांच्या पूर्णत्वाकडे उभारणीस सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी धामणी प्रकल्पांची माहिती देत या प्रकल्पांमुळे शेतकरी तसेच अनेक गावांच्या नागरिकांना यामुळे पाण्याची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न एम. विश्वशरय्या यांचे प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाचे एस.एन.पाटील व आभार विशाल शेळोलकर यांनी केले.
यावेळी राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, भुमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, एस.एन.पाटील, यांत्रिकी विभागाचे संग्राम पाटील, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी व यांत्रिकी अभियंता, माजी उपसभापती अरुण जाधव, शिवाजी चौगुले, दीपक शेट्टी, तानाजी चौगले, जलसंपदा विभागाचे कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार निर्माळे यांनी केले.