जिल्ह्यात तालुका स्तरावर १२ आणि जिल्हा स्तरावर १ असे एकूण १३ भरारी पथकांची स्थापना
कोल्हापूर – शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाकडून तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बंधू व महिला शेतकरी यांना बियाणे, खते व किटकनाशके यांच्या खरेदी-विक्रीबाबत तक्रारी असल्यास, त्या तक्रारींचे निराकरण या कक्षामार्फत केले जाणार असून शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
खरीप हंगाम सुरु होत असताना शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशके यांसारख्या आवश्यक निविष्ठांच्या खरेदीसाठी वितरकांकडून जादा दर आकारणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, माल उपलब्ध असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडू शकतात. यामुळे शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक बोजा येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जादा दराने निविष्ठा विक्री, मालाची कृत्रिम टंचाई,निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते किंवा किटकनाशके याबाबत तक्रारी नोंदवाव्यात. तक्रारींची प्रभावी हाताळणी करण्यासाठी आणि निविष्ठा विक्री केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर १२ आणि जिल्हा स्तरावर १ असे एकूण १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
ही भरारी पथके नियमितपणे बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्या दुकांनांची तपासणी करत असून, जादा दराने विक्री, बोगस मालाची साठवणूक, तसेच ग्राह्य न पडणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, विक्री पावत्या आणि साठा नोंदी यांचीही काटेकोर तपासणी या पथकांद्वारे केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक शोषण रोखण्यास मदत होणार असून, दोषी वितरकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल. या भरारी पथकांमध्ये तालुकास्तरावरील कृषी अधिकारी आणि जिल्हास्तरावरील गुणवत्ता निरीक्षक सहभागी असून, तपासणीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
तक्रार निवारणासाठी अधिकाऱ्यांची तालुकानिहाय यादी – करवीर- सतीश बापूसाहेब देशमुख, कृपंचायत समिती अ.- ९९७५३२००२१, कागल- गौरी मठपती, कृपंचायत समिती अ.- ९३०९९७६६९२, राधानगरी- मगदूम बी.ए. कृपंचायत समिती अ. – ८००७५५०५३३, गगनबावडा- जाधव के डी. कृपंचायत समिती अ. – ८७९९९३११३९, शिरोळ- दीप्ती बावधनकर-कृपंचायत समिती अ. – ९८६०४७२९२९, हातकणंगले- वर्षा प्रमोद पाटील, कृपंचायत समिती अ. ९९२२१३०१४०, पन्हाळा- शरद विठ्ठलराव शिंदे. कृपंचायत समिती अ. – ७५८८४९०७८१, शाहूवाडी- गोरे एन.ए. कृपंचायत समिती अ. – ९५९५४८५४४६, आजरा- दिनेश शेटे कृपंचायत समिती अ. – ९४२०७७८१०५, चंदगड- कांबळे भूपाल कृपंचायत समिती अ. – ७७९८९५०३८३, भुदरगड- सुशांत एकल- कृपंचायत समिती अ. – ९५४५११२७७७, गडहिंग्लज- सुधाकर रामचंद्र खोराटे कृपंचायत समिती अ. – ९८६०३९७५७०, लव्हटे बी एस., मोहीम अधिकारी, जि.प.कोल्हापूर जिल्हा – ९०२१७६८१८२, शेणवे व्ही. एस. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, कोल्हापूर जिल्हा – ९४०४३०५८४८,
शेतकऱ्यांनी आपली तक्रार संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी. यामुळे त्यांना योग्य दरात आणि गुणवत्तेची निविष्ठा मिळवण्यास मदत होणार आहे. “भरारी पथकांची स्थापना हा एक ठोस उपाय असून, जिल्ह्यातील निविष्ठा वितरण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे श्री.पांगरे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.