आठ महिने पगाराविना असलेल्या एनटीसी गिरणी कामगारांची खासदार सुप्रियाताई सुळेंनी आंदोलनस्थळी घेतली भेट…
मुंबई – गरीब कष्ट करणार्यांनी मेरीटवर नोकर्या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कटकारस्थान केंद्रसरकार करत आहे त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्रसरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.
एनटीसीच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही त्याबद्दल आज एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला.
स्थानिक लोकांचा आदर करण्याची पध्दत ईडी सरकारकडे नाही; खासदार सुनिल तटकरेंना बोलू न दिल्याने सुप्रियाताई सुळेंनी साधला निशाणा…सुनिल तटकरे हे स्थानिक खासदार असताना बोलायला दिले नाही याचे मला आश्चर्य वाटत नाही. स्थानिक लोकांचा आदर करण्याची पध्दत यांच्याकडे नाही. कुठेही गेले तरी लोकांचा अपमानच करतात असा थेट हल्लाबोल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ईडी सरकारवर केला.
महाराष्ट्र सदनात कार्यक्रम झाला तिथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा ज्यापध्दतीने हटवण्यात आला हे अतिशय दुर्दैवी आहे. महापुरुषांचा अपमान करणे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपमान करणे ही ईडी सरकारची पध्दत आहे आणि महाराष्ट्राचा अपमान कसा होईल त्याच्यातच केंद्रसरकारला आनंद मिळतो हे त्यांच्या वागणूकीतून दिसते असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी लगावला.