सुमारे साडे सतरा हजारांहून अधिक लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या मंजुरीपत्रांचे वाटप…
कोल्हापूर – कागल (बामणी) राज्यातील नागरिकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध कल्याणकारी योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहचाव्यात हीच सरकारची अपेक्षा असते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरासारख्या अभियानामधूनच जनतेच्या अशा अपेक्षा पूर्ण होत असतात असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील बामणी येथील आर के हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाचे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीशसिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे उपस्थित होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, केशरी शिधापत्रिका धारकांना अजूनही तांदूळ, गहू मोफत मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून ही सुविधा नागरिकांना मिळवून द्यावी तसेच लाडकी बहीण योजनेत काही माता – भगिनीं या योजने बाहेर राहिल्या आहेत. ही बाब मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही केवळ राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या भावनेने राज्य सरकारने सुमारे 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना नागरिकांचे वीज बिल शून्यावर आणणारी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी सुमारे १७ हजार ५०७ लाभार्थ्यांना या शिबीरात लाभ देण्यात आला.
जिल्हाधिकारी विजय राठोड म्हणाले की, नागरिकांना शासनाच्या विविध सेवा एकाच छताखाली आणि अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळून त्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करणे शक्य होत आहे. तसेच नागरिकांनी या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहनही केले.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी व वीज बिल माफी करून अडचणीत असलेल्या शेतक-यांना दिलासा दिला आहे. यावेळी गोकुळचे माजी संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
भेट शरद पवारांशी ……!
दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट झाली . यावेळी त्यांनी ऊस तंत्रज्ञानातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या वापराविषयी व उत्पन्न वाढीविषयी चर्चा केली.या निमित्ताने त्यांच्यांशी अनेक वर्षांनंतर बोलणे झाले – मंत्री हसन मुश्रीफ
यावेळी नगराध्यक्षा सविता माने, कागल पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपसभापती इंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, शिवानी भोसले, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, धनश्रीदेवी घाटगे,पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, अनिलकुमार हेगडे, दिगंबर अस्वले,रूपाली आंगज, तेजस्विनी भोरे, मनिषा पाटील, बाबासाहेब सांगले, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, नेताजी मोरे यांच्यासह संबंधित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































