शिवाजी विद्यापीठात जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत संवाद व कृती कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर – शाश्वत जलव्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी नेहमीच जलसंपदा विभागासाठी योगदान देतील, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. जलसंपदा विभागातील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 निमित्त आयोजित संवाद व कृती कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, जलसंपदा विभागात अनेक प्रकल्प सुरू आहेत. वेगवेगळ्या कृती आराखड्यांमधून जलव्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. प्रत्यक्ष अनुभवांना शैक्षणिक व संशोधनात्मक जोड मिळाल्यास एक चांगला जलव्यवस्थापन कृती आराखडा तयार करता येईल. या कार्यक्रमास पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, रोहित बांदिवडेकर, स्मिता माने, अशोक पवार, व्याख्याते प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. आसावरी जाधव, प्रशांत पाटील यांच्यासह विद्यार्थी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठातील जलव्यवस्थापन प्रकल्पाचे तपशील सांगताना विद्यापीठ ८५० एकरात पावसाचे पाणी अडवून स्वयंपूर्ण झाल्याचे सांगितले. येत्या काळात जलसंपदा विभागाने त्यांचे अनुभव सांगून, अडचणी मांडून त्याला संशोधनाची जोड द्यावी. जेणेकरून चांगल्या संशोधनातून नवनवीन जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना समोर येतील.
अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे यांनी शाश्वत जलव्यवस्थापनासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लोकाभिमुख कामे करून पारदर्शक पद्धतीने आराखड्यांची निर्मिती व अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पाण्याच्या अतिवापरामुळे अनेक जमिनी क्षारपड होत आहेत. नव्या पिढीला आपण संकटात टाकत असून, मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्यामुळे त्यांचे भविष्य अडचणीत येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्रदीर्घ काळासाठी पाण्याचे नियोजन, बचत आणि व्यवस्थापन गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. यानंतर त्यांनी पाटबंधारे विभागाकडे असलेल्या सिंचन क्षेत्रात येत्या काळात वाढ करून ते १०० टक्के करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले.
विद्यापीठातील भूगोल विभागाचे प्रमुख व व्याख्याते डॉ. सचिन पन्हाळकर यांनी भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलव्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरणशास्त्र विभागाच्या डॉ. आसावरी जाधव यांनी शाश्वत जलव्यवस्थापनावर भाष्य केले, तर नेटाफीमचे संचालक प्रशांत पाटील यांनी ठिबक सिंचनाचे महत्त्व सांगितले. कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी मागील काळात शिवाजी विद्यापीठाबरोबर केलेल्या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी केले. यामध्ये त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.