व्यापक जनजागृतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर – नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व समाजघटकांतील भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि त्यांना अनुषंगिक सर्व सहकार्य मिळावे, या दृष्टीने यंत्रणांनी चोख नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
या ऐतिहासिक कार्यक्रमास देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी, शीख, सिकलगीर यांसह नऊ विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास आणि त्यांचे बलिदान नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायन, चित्रकला, वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी या उपक्रमांच्या व्यापक प्रसिद्धीसाठी दररोजची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश दिले असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सतिंदर सरताज यांचे गाणे व माहितीपट दाखवून जनजागृती करावी, असेही स्पष्ट केले. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करून सामाजिक संघटनांशी सातत्याने समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला.
या शताब्दी वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने खुली व महाविद्यालयीन अशा दोन गटांत निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले साहित्य २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत hinddichadarkolhapur@gmail.com या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले असून जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे प्रशासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

















































