इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना पत्राव्दारे आवाहन
कोल्हापूर – मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली इ. 10 वी व इ. 12 वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडण्यासाठी राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. समाजाच्या उज्वल भविष्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक प्रयत्नांमधून यश संपादन करा. विद्यार्थ्यांना सकारात्मक वातावरण मिळावे तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. आगामी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी निर्धास्त, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षेस सामोरे जावे, यासाठी जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांसोबत आहे. भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा या संकल्पनेला बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून, ते ज्ञानवृध्दी आणि जीवन घडविण्याचे साधन आहे.
आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रे भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी कटीबध्द आहे. परीक्षांच्या धर्तीवर राज्यामध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा प्रक्रीयेसाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी सर्वजण मिळून प्रामाणिकतेने आणि न्याय मार्गाने शिक्षणाला पुढे नेऊयात, असे आवाहनही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.