पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलेट बाईक रॅली आयोजन…
कोल्हापूर – पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृतीसाठी कृषी विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन 2024-25 या योजनेअंतर्गत दि. 28 मार्च 2025 रोजी नरतवडे, ता. राधानगरी येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिलेट महोत्सव व या अंतर्गत सकाळी 9 वाजता सुळंबी-नरतवडे-मांगेवाडी-सरवडे-मालवे-तुरंबे-कपिलेश्वर-मांगोली-आकनूर-नरतवडे या मार्गावरमिलेट बाईक रॅली आयोजन करण्यात आली आहे. यानंतर सकाळी 10 वाजता जय भवानी मंगल कार्यालय नरतवडे, ता.राधानगरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिली आहे.
भारत तृणधान्य उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आशियातील 80 टक्के म्हणजेच सुमारे 170 लाख टन तृणधान्यांचे उत्पादन आपल्या देशात होते. केंद्र शासनाने ज्वारी, बाजरी, नाचणी व इतर लघु तृणधान्य पिकांची आहारातील उच्च पोषकतत्वे विचारात घेता भारतीय राजपत्रात या पिकांना पौष्टिक तृणधान्य म्हणुन घोषीत केलेले आहे. 2018 हे राष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे केले होते. बदलत्या जीवन शैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली आहे. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखी पौष्टिक तृणधान्ये ही लोह, कॅल्शियम, झिंक, आयेाडिन इ. सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त आहेत. पौष्टिकतृणधान्य आधारित पदार्थाचा वापर दररोजच्या आहारात वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनातून व मुल्यवर्धनातून कोरडवाहू, आदिवासी भागातील शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याची या पिकांमध्ये क्षमता आहे. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे समाजामध्ये जीवनशैली विषयक वाढत असलेले आजार नियंत्रण करण्याची क्षमता या पिकांमध्ये आहे.
या कार्यक्रमास डॉ.योगेश बन यांचे पौष्टिक तृणधान्य लागवडीची संधी व लागवड तंत्रज्ञान, डॉ.देवेंद्र रासकर यांचे निरामय आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्व, अमर पाटील यांचे ऊस नाचणी आंतरपीक, मिलिंद पाटील, यांचे उन्हाळी नाचणी व वरी लागवड यशोगाथा अर्चना देसाई यांचे महिलां करीता प्रक्रिया उद्योगातील संधी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे औचित्य साधुन कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ट्रॅक्टर, पॉवर टिलर, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व इ. बाबीचा लाभ मिळणा-या शेतकरी लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात येणार आहेत. कार्यक्रम स्थळी पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया उत्पादनांचे स्टॉल लावुन विक्रीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, ग्राहक, तृणधान्य उत्पादकांचे संघ, विक्रेते, उद्योजक, अन्नप्रक्रिया उद्योजक तसेच शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक नामदेव परीट, करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी राधानगरी रमेश गायकवाड यांनी केलेआहे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.