विनायक जितकर
लोकांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी बिद्री मध्ये परिवर्तन महत्वाचे…
तुरंबे – बिद्री कारखान्यात सभासदांच्या हिताच्या कारभाराऐवजी स्वहिताचा कारभार सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांची एकाधिकारशाही ही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे. लय भारीची टिमकी वाजवणाऱ्या के पी पाटील यांचा कारभार हा सभासदांच्या हिताचा नव्हे, तर स्वहिताचा आहे. असा हल्लाबोल विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेत करण्यात आला.
राधानगरी तालुक्यातील तुरंबे गणपती मंदिराच्या आवारात झालेल्या या सभेत सर्वच नेत्यांनी सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांच्या कारभारावर हल्ला चढविला. “परिवर्तन आघाडीला सभासदांचा वाढता प्रतिसाद मिळत असून यंदा कारखान्यात नक्की परिवर्तन होणार” असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
ए. वाय. पाटील यांनी जोरदार फटकेबाजी करत. के. पी. पाटील यांच्यावर थेट निशाणा साधताना, “आलंय ते मला, उद्याचं ते तुला” अशी के. पी. पाटलांची निती आहे. गेली ३५ वर्षे मी त्यांच्यासोबत आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ दिली. मात्र त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही. एकाधिकारशाही हा त्यांच्या कामकाजाचा मुख्य भाग आहे. त्यांच्या संकुचित वृत्तीच्या कामकाजाला कंटाळून आपण बाहेर पडलो. असे ए. वाय. पाटील यांनी सांगितले.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, “बिद्री कारखाना हा सभासदांच्या हातात सोपविण्यासाठी आमची लढाई आहे. कै. सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांच्या विचारधारेने खासदार संजय मंडलिक व मी एकत्र आलो आहोत. बिद्री कार्यक्षेत्रातील सभासदांचा बिद्री कारखानासाठी ऊस नेला जात नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाविषयी शंका येते. बिद्री कारखाना बिद्रीच्या सभासदांच्या साठी आहे की शेजारील खाजगी कारखान्याला ऊस पुरवठा व्हावा म्हणून त्यांचा कारभार सुरू आहे? बिद्री कारखानाच्या निवडणुकीत यावर्षी परिवर्तन अटळ आहे.”
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले,” लोकांच्या अर्थकारणाला गती व बिद्रीच्या हिताचा कारभार हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन आघाडीची रचना केली आहे. बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मी मुलगा आहे. माझे वडील बिद्री कारखान्याचे कामगार होते. यामुळे बिद्री कारखान्याच्या विकास प्रकल्पात अडचणी आणण्याचे पाप माझ्या हातून घडणार नाही. सत्ताधारी मंडळी सभासदांची दिशाभूल करत आहेत. का कारखान्याला साठ वर्षे झाली.
मात्र कारखान्याचा विस्तार आणि विकास त्या गतीने झाला का? सभासदांचा ऊस वेळेवर नेला जात नाही. मुदाळमधील पन्नास टक्के सभासदांचा उस उचलला जात नाही. सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचा फायदा सभासदांना होत नसेल तर तुमच्या सत्तेचा काय उपयोग? तुम्ही लय भारी कारभाराची टिमकी वाजवता तर संचालक बाहेर का पडले? असा खडा सवाल आबिटकर यांनी के पी पाटील यांना केला. राजकारणासाठी नव्हे तर सभासदांच्या उत्कर्षासाठी, लोकांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आम्ही बिद्री कारखान्याची निवडणूक लढवीत आहोत असेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, “कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना के.पी. पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. के पी पाटील यांचा कारभार एकाधिकारशाहीचा आहे. कारखाना कागल तालुक्यात आहे पण कागल तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस नेला जात नाही. कागलला कारखाना क्षेत्रातून हद्दपार करण्याचे षड्यंत्र केपी यांचे दिसते. सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी परिवर्तन आघाडी झाली आहे. परिवर्तन आघाडीसाठी यंदा अनेक शुभसूचक घटना घडल्या आहेत.
यावेळी मारुतीराव जाधव गुरुजी, कारखान्याचे विद्यमान संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली. याप्रसंगी परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. सभेला कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे प्रा. किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, शेतकरी संघाचे सुरेश देसाई, बाबुराव देसाई आदी उपस्थित होते. प्रा. राजेखान जमादार यांनी सूत्रसंचालन केले. आभार माजी उपसभापती अरुणराव जाधव यांनी मानले. सभेला मोठी गर्दी झाली होती. वाजतगाजत उमेदवार सभास्थळी दाखल झाले.