संघर्ष काळात पीचवर टिकणे महत्त्वाचे : सचिन जाधव
विद्यापीठात ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर :
स्वप्नांच्या मागे धावताना संघर्ष काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याला धीराने सामोरे जावे लागते. या काळात सचिन तेंडुलकरसारखे पीचवर टिकून राहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ‘तेंडल्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या बी. ए. फिल्म मेकिंग कोर्सच्या वतीने ‘तेंडल्या’ चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांशी त्यांनी संवाद साधला.
जाधव म्हणाले, चित्रपट निर्मिती हे टीम वर्क आहे. कथा सांगताना ती छोटी किंवा मोठी नसते, तर ती नीट अभिव्यक्त करणे गरजेचे असते. त्यात सातत्य ठेवावे लागते. या प्रक्रियेत तुम्हाला धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात.
यावेळी सचिन जाधव यांनी प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, संकलन, संगीत, अर्थकारण याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्तावित केले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
कोल्हापुरातील चित्रपट दिग्दर्शक उमेश बगाडे, मयूर कुलकर्णी, डॉ. संजय तोडकर, चित्रपट परीक्षक डॉ. अनमोल कोठाडीया, मराठी विभागाचे माजी प्रमुख आणि जेष्ठ लेखक प्रा. डॉ. राजन गवस, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सचिव डॉ. शशिकांत चौधरी, प्रा. विकास कांबळे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार, मतीन शेख, डॉ. जयंत कार्तिक, अभिनेता दिग्विजय रोहिदास, प्रमोद कुलकर्णी, जितेंद्र देशपांडे, गायिका रंजन कुलकर्णी, दिग्दर्शक संकपाळ, अभिनेता राज पाटील उपस्थित होते. साक्षी वाघमोडे हिने सूत्रसंचालन केले. अनुप जत्राटकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
१. तेंडल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंग वेळी उपस्थित प्रेक्षकांची संवाद साधताना दिग्दर्शक सचिन जाधव.
2. शिवाजी विद्यापीठात तेंडल्या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी रसिकांनी केलेली गर्दी