GOOD INFORMATION-नक्की वाचा; कोल्हापूर.. पर्यटनातून समृद्धीकडे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नैसर्गिक साधन संपदेने समृद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा जागतिक पर्यटन नकाशावर येण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी सुमारे 2 हजार 700 कोटींहून अधिक रकमेचा निधी राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह संबंधित विविध विभागांनी प्रस्ताव तयार केले आहेत. यापैकी राज्य पुरातत्व विभागाने तयार केलेला 900 कोटींचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिर प्रसाद योजनेचा 91 कोटींचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे पाठवण्यात येत आहे. तसेच जिल्हा वार्षिक व इतर विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करुन देत जिल्ह्यातील पर्यटन स्थळे अधिकाधिक सक्षम बनविण्यावर शासन व प्रशासनाचा भर आहे. यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जावून कोल्हापूर जिल्हा अधिक समृद्ध होत आहे..

 

 

जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्याने सौंदर्याने समृद्ध अनेक ऐतिहासिक, धार्मिक, वन, कला, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक पर्यटन स्थळे, आहेत. त्याचबरोबर चित्रनगरी, जेवूर ऍडवेंचर पार्क, टाऊन हॉल, कणेरी मठ व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळ येथील वस्तुसंग्रहालये, पन्हाळा तालुक्यातील देवगिरी कृषी पर्यटन केंद्र, राधानगरी तालुक्यातील पडसाळी – चव्हाणवाडी येथील पर्यटन ग्राम आदी पर्यटन स्थळांचाही विकास होत आहे. त्याचबरोबर श्री गणेश विसर्जन मिरवणूक, श्री अंबाबाई देवीचा किरणोत्सव, रथोत्सव, नवरात्र, शाही दसरा महोत्सव, जोतिबाची चैत्री यात्रा, पट्टणकोडोलीची बिरदेव यात्रा, बाहुबली, पन्हाळ्याचा हजरत पीर म्हणजे सादोबाचा उरुस आदी यात्रा जत्रांमध्येही देशभरातील सर्वधर्मीय भाविक व पर्यटक सहभागी होतात. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. “मधाचे गाव पाटगाव” “रेशीम गाव” यासारखे उपक्रम राबवून गावे स्वयंपूर्ण होण्यावर प्रशासन भर देत आहे. तसेच पर्यटन सप्ताह, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व, शाही दसरा महोत्सव अशा उपक्रमांद्वारेही जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यात येत आहे.

पर्यटन विकासाला केंद्र व राज्य शासनाचे सहकार्य- कोल्हापूर हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध जिल्हा असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करुन जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले आहे.पुरातत्व विभागाकडील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांसाठी 900 कोटी रुपयांचा विकास आराखडा पुरातत्व विभागाने तयार केला आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे 1600 कोटींचा श्री क्षेत्र जोतिबा मंदिर प्राधिकरण विकास आराखडा तसेच वन्य जीव विभागामार्फत राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य, हत्तीमहल विकासासाठी ईको टूरिझम योजनेतून सुमारे 100 कोटींचा विकास आराखडा राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. श्री अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिरासह रांगणा, पन्हाळा, विशाळगड, पारगड किल्ला अशा महत्वाच्या स्थळांचे जतन, संवर्धन, दुरुस्ती व परिसर विकासाचे आराखडे तयार करुन त्यानुसार नियोजनबध्द विकास कामे केली जाणार आहेत. पन्हाळा ते विशाळगड दरम्यान ट्रेकींग मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा व दिशादर्शक फलकही लावण्यात येणार आहेत. यासह जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांचे विकास आराखडे सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महानगरपालिका आदी विभागांनी तयार केले असून ते जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात येतील.

जिल्ह्यात पर्यटनाला पोषक वातावरण आहे. येथील अनेक ठिकाणांना ऐतिहासिक, धार्मिकदृष्ट्या महत्व असून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच विविध विभाग प्रयत्नशील आहेत. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची दुरुस्ती, जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना दर्जेदार सोयीसुविधा देवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

विविध योजनांतून पर्यटन विकास – जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मधाचे गाव पाटगावसाठी निधी देण्यात आला आहे. पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता सन 2023 24 साठी 29 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यापैकी 16 कोटी 50 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून ही कामे सुरू झाली आहेत. सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून राधानगरी धरण स्थळावर पर्यटन वाढीच्या दृष्टीने रिसॉर्टचे बांधकाम, राजर्षी छत्रपती शाहू महाराज खासबाग कुस्ती मैदानाचा विकास, हातकणंगले तालुक्यातील आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी येथे संरक्षक भिंत, मंदिर व सभामंडप मार्गावरील विविध रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व चौकाचे सुशोभीकरण, सांस्कृतिक हॉल व भक्त निवास बांधकाम तसेच श्री अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील मौजे बटकणंगले येथील महादेव मंदिर परिसराचा विकासही करण्यात येणार आहे.

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व मूलभूत सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदान देण्यात आले आहे. यातून भवानी मंडप येथील हूजूर पागा इमारत येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमण करणाऱ्या शिवभक्तांच्या विश्रांतीसाठी शाहूवाडी तालुक्यातील आंबेवाडी येथे सभागृह बांधण्यात येत आहे. त्याचबरोबर राधानगरी धरण स्थळावरील राजर्षी शाहू महाराज माहिती केंद्राच्या परिसराचे सुशोभीकरण तसेच आजरा तालुक्यातील रामतीर्थ, चंदगड तालुक्यातील पारगड, शिरोळ तालुक्यातील खिद्रापुर, हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील हजरतपीर राजेबागस्वर दर्ग्याच्या ठिाकणी भाविकांना सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पर्यटन स्थळी जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती, काँक्रिटीकरण, खडीकरण, डांबरीकरण, अंतर्गत गटार व्यवस्था, वाहनतळ, परिसराचे सुशोभीकरण, जमीन सपाटीकरण व भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर कणेरी मठ येथे निवास व्यवस्थेच्या ठिकाणी पाणीपुरवठा करणे, सोयी सुविधा देणे रस्त्याच्या कडेच्या संरक्षक भिंतींचे बांधकाम, पेव्हींग ब्लॉक बसविणे, गावांतर्गत सोयी सुविधा, स्वच्छतागृह व परिसराची सुधारणा, पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठीच्या पाण्याची व्यवस्था, टाक्या बसवणे व नळ कनेक्शन आदी 11 कोटी 30 लाखांची कामे सुरु झाली आहेत.

ग्रामीण व दुर्गम भागातील पर्यटन स्थळांचा विकास- जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत सन 2022- 23 मध्ये 61 कोटी 81 लाखांच्या कामांना राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत 24 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तर सन 2023 -24 साठी 4 कोटी 90 लाख रुपयांच्या निधीसाठी मंजुरी मिळून 2 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाची कामे सुरु झाली आहेत.कागल येथील पाझर तलावाठिकाणी लेझर शो, हिलिंग गार्डन, मौजे वडगाव येथील श्री भैरवनाथ मंदिर देवालय परिसराचा विकास करण्यात येणार आहे. मौजे वाळवे खुर्द येथील हनुमान मंदिर परिसराचा विकास यात हनुमान मंदिर ते नदी घाटापर्यंत जाणारा पालखी मार्ग, मंदिर परिसराची सुधारणा, नदी घाट व भक्त निवासाचे बांधकाम, स्वच्छतागृह व सभागृह बांधण्यात येणार आहे. कागल तालुक्यातील अर्जुनी तलाव व कौलगे येथील तलावाचे सुशोभीकरण, बागबगीचा व अंबाबाई मंदिर परिसराची सुधारणा करण्यात येणार आहे. कागल तालुक्यातील मौजे दौलतवाडी येथील भैरवनाथ मंदिर परिसराचेही सुशभीकरण, मेटके येथे बाळूमामा देवालय सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
 

गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड येथे निसर्ग पर्यटन केंद्राचा विकास, किल्ले पारगड व सामानगड येथे विकास कामे करण्यात येणार आहेत. करवीर तालुक्यातील मौजे खेबवडे येथील मंदिर परिसराचा विकास, शाहूवाडी तालुक्यातील मौजे कासार्डे येथील स्वयंभू महादेव तीर्थक्षेत्र येथे धोपेश्वर मंदिराचे बांधकाम, संरक्षक भिंत, वाहनतळ, रस्ते व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

हातकणंगले तालुक्यातील मौजे रुई येथील प्राचीन व्यंकटेश मंदिर परिसराचे सुशोभीकरण व अन्य कामे करण्यात येणार आहेत. रुई येथील पीर हजरत अब्दुल मलिक दर्ग्याच्या परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. मौजे साजणी येथे ऐतिहासिक शाहू महाराज तलाव परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मौजे पट्टणकोडोली येथे बिरदेव मंदिर यात्रा परिसर रस्त्याचे डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. कुंभोज येथील श्रीक्षेत्र बाहुबली येथे यात्री निवास इमारतीचे विस्तारीकरण, मंदिर परिसरातील रस्ता, वाहनतळ, परिसराचे सुशोभीकरण, आळते येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी येथील अन्नछत्र इमारत व सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील यात्री निवास, दुकान गाळे बांधकाम, पार्किंग व्यवस्था तसेच कल्लेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे व अतिग्रे येथे गावाची प्रवेश कमान उभारण्यात येणार आहे. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर परिसरात वाहनतळ, नदी घाट व परिसरात सुधारणा करण्यात येणार असून मंदिराची स्वागत कमान व रस्त्याचे बांधकाम होणार आहे.
पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे अंगरक्षक वीर ज्योत्याजी केसरकर यांच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता व गटार बांधण्याचे काम होणार आहे. करवीर तालुक्यातील मौजे कणेरी येथे महादेव मंदिर परिसराची सुधारणा करण्यात येणार आहे. आजरा, राधानगरी व भुदरगड तालुक्यातील विविध विविध पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण व अन्य विकास कामे होणार आहेत.

गगनबावडा तालुक्यातील गगनगिरी मठाचा परिसर विकास, राधानगरी तालुक्यातील कासारवाडी येथील धबधब्यांच्या ठिकाणांचा विकास, दुर्गमानवाड येथील विठलाई मंदिर परिसरातील कामे, मौजे तुरंबे येथील गणेश मंदिर परिसराचे सुशोभीकरण व सभागृह बांधकाम करण्यात येत आहे. आजरा तालुक्यातील सिरसिंगी येथील गोठणदेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण व चाळोबा पर्यटन स्थळाचा विकास, गडहिंग्लज तालुक्यातील श्री महालक्ष्मी मंदिर देवालयाचा विकास आदी विकासकामांना प्रशासनाच्या वतीने निधी उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील पर्यटन स्थळांचा विकास साधला जाईल.

गड- किल्ले, मंदिरे व संरक्षित स्मारकांचे संवर्धन- राज्यातील गड- किल्ले, मंदिरे व महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी यावर्षी 2023-24 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 13 कोटी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी 4 कोटी 83 लाख रुपयांच्या निधी मिळाला असून ही कामेही सुरु झाली आहेत. यातून जिल्ह्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यात राज्य संरक्षित स्मारक पांडवदरा लेणी, मौजे बोरीवडे येथील मसाई पठाराचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.  तसेच भुदरगड तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक भुदरगड किल्ला येथील पेठ शिवापूर जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.
 ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रमातून ग्रामीण विकासाला चालना – भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्ये ‘मधाचे गाव पाटगाव’हा उपक्रम राबविण्यात येत असून याव्दारे पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी ही गावेही स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’स्पर्धेत ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करुन इथल्या मध उद्योगाला चालना देण्यात येत आहे.        
     मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देवून पाटगावचा मध जगभरात पोहचवण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न होत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 2 कोटी 26 लाखांहून अधिक रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाखांचा निधी वितरीत केला असून यातील 31 लाख 71 हजारांच्या निधीतून ‘मधाचे गाव पाटगाव’ उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून मध उद्योगाबरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देवून पाटगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावचा विकास हा राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून करण्यात येणार आहे. 
 पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’च्या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत मध निर्मिती, विक्री व पर्यटनपूरक उद्योगांतून पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना देण्यात येत आहे. भुदरगड तालुक्यात पाटगाव मध्ये शिवकालीन संत मौनी महाराज यांची जिवंत समाधी, पाटगाव धरण म्हणजेच 'मौनी जलाशय, रांगणा किल्ला आदी प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. या परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत.
  पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी माहिती केंद्र, सेल्फी पॉईंट, दिशादर्शक फलक तसेच होम स्टे, हॉटेल, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देण्यात येत असून यामुळे रोजगार निर्मिती होवून डोंगराळ भागातील गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. याच धर्तीवर जिल्ह्यात रेशीम गाव उपक्रम राबविण्यात येणार असून कारभारवाडीचा सेंद्रीय गुळ, कोल्हापुरी चप्पल, मिरची, बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू, कोल्हापुरी साज, चांदीचे दागिने आदी जिल्ह्यात तयार होणाऱ्या वस्तू व उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तसेच  महिला स्नेही संकल्पनेत तृतीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या कागल तालुक्यातील आलाबाद ग्रामपंचायतीसारख्या गावांना प्रोत्साहन देवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. 
“वन्य रेशीम”चा जिल्हा – कोल्हापूर वन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात वनअमृत व टसर रेशीम प्रकल्प राबवण्यात येत आहे. वनअमृत प्रकल्पात करवंद, जांभूळ, आंबा, फणस, काजू बोंड, कोकम, तांदुळ, नाचणी यांवर प्रक्रिया करुन त्यापासून महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तसेच दुर्गम व डोंगराळ भाग असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी-धनगरवाडी गावात “टसर रेशीम प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘ ऐन ‘ झाडावर टसर अळी सोडून त्यातून कोष तयार करुन शेतकऱ्यांकडून टसरचे उत्पादन घेतले जात आहे. रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना गावातच स्वयंरोजगार उपलब्ध होऊन गावाचं अर्थकारण बदलत असल्याने ऐनवाडी हे गाव ‘जंगल रेशीम गाव’ म्हणून उदयास येत असून कोल्हापूर जिल्ह्यालाही “वन्य रेशीम निर्मिती होणारा जिल्हा” अशी नवी ओळख मिळत आहे. यामुळे पर्यटकांचाही ओघ वाढण्यास मदत होत आहे.
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य - जगभरातील पर्यटक कोल्हापूरात येत असताना पर्यटकांसाठी कोल्हापूर शहर परिसरात सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध महत्वपूर्ण प्रकल्प व योजना राबवण्यात येत आहेत. नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत कोल्हापुरातील पंचगंगा घाट व रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबरोबरच विविध विकासकामे करुन या भागाचे जतन व संवर्धन होणार आहे. रंकाळा तलाव येथे मिनिएचर पार्कचे कामही लवकरच सुरु होत आहे. पार्किंग व्यवस्था, भिंतीचे संवर्धन व पदपथ दुरुस्ती, उतरत्या दगडी भिंतीची दुरुस्ती व रंकाळा टॉवरचे जतन व संवर्धन आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर रंकाळा तलावाच्या सभोवतालच्या लहान दगडी भिंतींची दुरुस्ती व येथील संध्यामठ आणि धुण्याची चावीचे जतन व संवर्धन होणार आहे. तसेच कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी रोड, बिंदू चौक, सीपीआर रोड, दसरा चौक आणि जयंती नाला रोड येथे डेकोरेटीव्ह विद्युत खांब बसविण्यात येणार असल्यामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडेल. केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान जतन व संवर्धन करण्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मंजूर झाला असून ही कामेही जलद गतीने होतील. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क व बॉटनिकल गार्डन तयार करुन ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या विकासासाठीही कोल्हापूर महानगरपालिकेला निधी मंजूर झाला असून हे कामही सुरु करण्यात आले आहे.
  पर्यटन स्थळांचा मूलभूत विकास योजनेंतर्गत श्री अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसवून मंदिर परिसर उजळवण्यात येणार आहे. याकामांसह शहरातील विविध रस्त्यांची दुरुस्ती, काँक्रिटीकरण, उद्यानांची दुरुस्ती ही कामे झाल्यावर कोल्हापुरचे रुपडे पालटेल..
पर्यटकांसाठी राहण्याच्या व जेवणाच्या उत्तम सोयी सुविधा तयार करणे, वाहतुक व्यवस्था, प्रशस्त पार्कींग, पर्यटन स्थळांचे दिशादर्शक फलक लावण्यासह जिल्ह्यातील प्रत्येक पर्यटन स्थळी पर्यटकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती, शासनाचे विविध विभाग, राज्य शासन, पुरातत्व विभाग, वन विभाग व केंद्र सरकारच्या वतीने नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिकांचे सहकार्य मिळत असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा चेहरामोहरा बदलेल व जगभरातील पर्यटकांचा ओघ निश्चितच वाढेल..

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.