डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा लोककलेचे संवर्धन करणारा युवा महोत्सव…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रा. डॉ. बाबा बोराडे

महोत्सवात ३६ विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार…

सांगली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रिय युवा महोत्सव यावर्षी दि. ४ ते ७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान विद्यापीठ परिसरात होत आहे. या महोत्सवात ३६ विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यासाठी सहा भव्य रंगमंचांची उभारणी करण्यात येत आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, बीड आणि उस्मानाबाद (धाराशिव) या जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थीनी महोत्सवात सहभागी होणार आहेत.

मराठवाड्यातील लोकपरंपरा आणि लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचे काम केंद्रिय युवक महोत्सवातून केले जाते. पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी निघणारी शोभायात्रा हे या महोत्सवाचे आकर्षण असते. रंगमंचावर सादर होणाऱ्या कला प्रकारांचे सुक्ष्म सादरीकरण यावेळी करण्यात येते. विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सळसळता उत्साह अलौकीक तसेच देखणा असतो. शोभायात्रेत ज्वलंत सामाजिक प्रश्न आणि समस्यांवर प्रकाश टाकला जातो. पुढील चार दिवस परिसरात काय सादर होणार आहे, कलाकार युवक, युवतींचा कल कशाकडे आहे, याचा अंदाज संयोजकांना याचवेळी येतो. त्यामुळे शोभायात्रेला विशेष महत्त्व असते. प्रचंड उत्साहात संयोजक आणि सहभागी विद्यार्थी यात सहभागी झालेले असतात.

चार दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवावेळी विद्यापीठात कधीच रात्र होत नाही. पहाटेपासून, उत्तर रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानातून, विद्यापीठाच्या रस्त्यावर, वाद्यांचे, गाण्यांचे, दंग्याचे, मस्तीचे आवाज ऐकू येत असतात. सर्व परिसर सळसळते तारुण्य, नवलाई, उत्साह आणि बेधुंद मस्तीने गजबजलेला असतो. तीन हजार विद्यार्थ्यांचा मेळा येथे जमलेला असतानाही कसलाच अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही. वाद नाही, तंटा नाही, भांडण नाही, हेवेदावे नाहीत. विद्येच्या माहेरघरात सर्वच ज्ञानपिपासू आपापल्या कलेची झलक दाखवायला आलेले असतात. प्रत्येक कलेच्या रंगमंचावर शिस्त असावी म्हणून स्पर्धा असते. त्यासाठी क्रमांकही काढले जातात. पारितोषिके दिली जातात. परंतु कलावंत युवा पिढीला त्याचे काही घेणे-देणे नसते. त्यांना केवळ आपली कला सादर करायची असते. नंबर आला किंवा नाही काय, याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. युवा कलाकार त्याकडे केवळ आनंद उत्सव, कला उत्सव म्हणून पाहत असतात. म्हणूनच या चार दिवसाच्या काळात येथे रुसवा, फुगवा, बाचाबाची काहीच होताना दिसत नाही. हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ युवक महोत्सवाच्या माध्यमातून मराठवाड्यातील कलागुण जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अखंडपणे करीत आहे. कालबाह्य होत चाललेल्या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने नव कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे. त्यामुळे दरवर्षी नवनवे कलाकार तयार होतात. दरवर्षी ऑगस्टपासूनच मराठवाड्यातल्या विविध महाविद्यालयातून लोकवाद्याचे आवाज घुमू लागतात. महाविद्यालयाच्या हॉलमधून ढोलकी, तुणतुणे आणि घुंगरांचा आवाज कानावर आला की ज्याच्या अंगात कलेचे बीज उमलू लागले आहे, तो किंवा ती कलाकार फुरफुरल्याशिवाय राहत नाही. येथेच नव्या कलाकाराचा, लोककलेच्या उपासकाचा जन्म होतो.

  • महाराष्ट्राची लोककला समजल्या जाणाऱ्या लोकनाट्य, तमाशा कलेला सध्या उतरती कळा आलेली आहे. अनेक फड बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लोकनाट्य कला जीवंत ठेवण्यासाठी विद्यापीठाने सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले आहे. युवा महोत्सवातून दरवर्षी किमान शंभर महाविद्यालये लोकनाट्य कलाप्रकारासाठी नोंदणी करतात. याचाच अर्थ मराठवाड्यातील शंभर महाविद्यालयातून लोकनाट्याच्या तालमी होतात. म्हणजे दरवर्षी सहाशे लोककलाकार केवळ लोकनाट्य कलेसाठी नव्याने तयार होतात. लोकनाट्य सादरीकरणासाठी लागणारे चारशे वादक निर्माण होतात. आजपर्यंतची परंपरा लक्षात घेता, मराठी चित्रपट आणि दूरदर्शनवरील मराठी वाहिन्यांवर मराठवाड्यातील लोककला प्रकारातील अनेक कलाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून पुढे गेलेले आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

लोकनाट्याप्रमाणेच पोवाडा, भारुड, वासुदेव, गोंधळ, भजन, लोकगीत, लावणी, लोकनृत्य, आदिवासीनृत्य, लोकवाद्यवृंद, कव्वाली, जलसा आदी लोककला युवा महोत्सवातून दरवर्षी प्रचंड उत्साहाने सादर केल्या जातात. त्यासाठी विद्यापीठाने कलेच्या आकृतीबंधाची पारंपरिक नियमावली घालून दिलेली आहे. लोक परंपरेप्रमाणे, मूळ स्वरुपातच लोककला सादर करण्यात याव्यात, असा विद्यापीठाचा नियम आहे. त्यामुळे या कलांची तालीम करताना विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासही करावा लागतो. त्यातून नवीन लोककलाकार उदयाला येतो. भविष्यात हाच कलाकार महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे नाव कलाक्षेत्रात ऊंचावतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, ग्रामीण भागातील विद्यार्थी देशपातळीवर झळकावेत, जात, धर्म, उच्चनीचता, परंपरा, भेदाभेद न मानता ते अखंड तेवत राहावेत, यासाठी विद्यापीठाच्या युवक महोत्सवाचा मोलाचा वाटा आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.