‘ उबाठा ‘ ला उभारी!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
9850863262

‘ उबाठा ‘ ची अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बैठक नुकतीच कार्यसम्राट आमदार आणि ‘मातोश्री ‘चे खासे शिलेदार भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपळूण येथे पार पडली. प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती तरी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभल्याने त्याला मेळाव्याचे स्वरूप आले असे सांगितले जाते. (हल्ली कोणत्याही पक्षाची, गटाची बैठक ही प्रमुख कार्यकर्त्यांची आहे असे आवर्जून सांगितले जाते. त्यामुळे गर्दी कमी झाली तर लाज राखली जाते आणि त्यातून चांगली गर्दी जमलीच तर पाठ थोपटून घेता येते. हे आपले माझे निरीक्षण आहे. कदाचित ते चुकीचेही असू शकते.) त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा सर्वांना स्फुरण चढले आहे. आगामी निवडणुकीत चिपळूण – संगमेश्वरचा आमदार महाविकास आघाडीचाच (शक्य तो उबाठा चा) झाला पाहिजे असा निर्धार या मेळाव्यातून आमदार भास्कर जाधव आणि उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. आघाडीचा हक्काचा आमदार ध्यानीमनी नसताना शत्रूच्या गोटात सामील झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. आता मात्र सर्वजण त्यातून केवळ सावरले आहेत एवढेच नाही तर अनेकांना पंख फुटू लागले आहेत. ते मतदारसंघात विहार करू लागले आहेत. यात विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्याने ही जागा शरद पवार गट मागू शकतो तर गेल्यावेळी शिवसेनेने ही जागा लढवली असल्याने तेही दावा करतील. मात्र सद्यस्थितीत त्यातल्यात्यात सक्षम उमेदवार आणि अधिक सक्रिय कार्यकर्ते हे उबाठा सेनेकडे आहेत त्यामुळे या जागेवर त्यांचाच दावा योग्य वाटतो.
या सर्व पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे स्वतः भास्करराव येथून लढतील तर गुहागरमध्ये आपल्या चिरंजीवाना विक्रांत यांना संधी मागतील (किंवा उलटही) अशी चर्चा कायम ऐकण्यास मिळते. परंतु यात फार तथ्य आहे असे वाटत नाही. कारण तब्बल पाच वेळा आमदारकी, एक वेळ विधानपरिषद सदस्य, मंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी मोठी राजकीय उपलब्धि असताना आता ते स्वतः थांबतील आणि सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यापैकी कोणाला तरी पुढे आणतील असे वाटते. त्याचप्रमाणे घराणेशाहीही त्यांना तात्विक दृष्टीने मान्य नसल्याने मुलाऐवजी ते सचिन कदम यांना गुहागरमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी आपले वजन खर्ची घालतील असे वाटते. (विक्रांत यांना जिप अध्यक्षपद मिळाले आहेच. ते तरुण आहेत. त्यांना काम केले तर पुढेही संधी मिळू शकते)पूर्वी काही गोष्टी घडल्या असल्या तरी गेल्या साडे तीन वर्षांत भास्करराव आणि सचिन कदम हे ‘ जानी दोस्त ‘ झाल्याचे दिसून येत आहे.

भास्करराव यांनी गेल्या तेरा वर्षात गुहागर मतदारसंघात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सततचा संपर्क, काम करण्याची धडाडी, आक्रमक भूमिका या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. गेल्या तेरा चौदा वर्षात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणण्यात ते यशस्वी झाले आणि मुख्य म्हणजे आपण , आपलं कुटुंब याला फार महत्व न देता आपला कार्यकर्ता जगला पाहिजे, उभा राहिला पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे या भावनेतून शेकडो तरुणांना रस्ते, पूल, साकव, पाखाड्या अशी अनेक प्रकारची कामे करण्याची संधी दिली. बेरोजगार अभियंते आज रोजगार मिळाल्याने खूष आहेत. गावागावात विकासकामे झाल्याने लोकं समाधानी आहेत. अशा चांगल्या परिस्थितीत सचिन कदम यांच्यासारखा नवीन उमेदवारही येथून सहज निवडून येऊ शकतो. स्वतः सचिन कदम हे गेली तेरा चौदा वर्षे गुहागर, खेड भागात जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेतच. त्यांना अनंत गीते यांचे ‘ कायमस्वरूपी ‘ आशीर्वाद आहेत. पावसाळा सोडता त्यांच्या गाडीच्या काचा नेहमी खाली असतात त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि लोकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे असे बोलले जाते. या सर्वाचे तात्पर्य हेच की भास्करराव यावेळी आपल्या मित्राला आमदार करतील यात काडीमात्र शंका नाही!
दुसरीकडे चिपळूणमध्येही भास्करराव स्वतःसाठी किंवा मुलासाठी प्रयत्न करणार नाहीत , तर ते रोहन बने यांच्यासारख्या तरुणाला आमदार करण्यासाठी जीवाचे रान करतील. रोहन बने यांच्या जमेच्या बाजू म्हणजे ते अबोल असले तरी तरुण, अभ्यासू, विकासाची दृष्टी असणारे आहेत. त्यांच्यामागे वडील आणि माजी आमदार सुभाष बने यांचा अनुभव, ताकद आहे. आणखी एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे यावेळी आमदारकीची संधी संगमेश्वर तालुक्यातील व्यक्तीला मिळाली पाहिजे हा आग्रह. आणि हा आग्रह चुकीचा वाटत नाही कारण तब्बल तीन वेळा सदानंद चव्हाण यांच्यारूपाने चिपळूण तालुक्यातील व्यक्तीला संधी दिली गेली. मागच्या निवडणुकीतच सुभाष बने रोहन यांना संधी मिळावी यासाठी आग्रही होते, मात्र मातोश्रीने आपले वजन सदानंद चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. तत्पूर्वी माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक हेही प्रयत्नशील होते. आता मात्र त्यातल्या त्यात नवीन, तरुण चेहरा

आजच निर्णय घ्या.. दिशाला जाँईन व्हा.. करीअर करा

म्हणून रोहन बने यांचे पारडे जड वाटते. चिपळूण तालुक्यातही आत्ता तरी तेवढ्या ताकदीचा उमेदवार नाही. सदानंद चव्हाण आमदार असताना प्रतापराव शिंदेंनी आपले नाणे वाजवण्याचा प्रयत्न केला होता पण तो फसला. उत्तम कबड्डीपटू असूनही त्यांना इथे योग्य ती ‘ पकड ‘ करता आली नाही. आता त्यांचा तेवढा जोर वाटत नाही. बाकी कोणी नाहीच. बाळा कदम हे (विधानसभा क्षेत्रप्रमुख असले तरी) जास्त करून चिपळूण शहरातच सक्रिय असतात. इथल्या राजकारणात त्यांचा उत्साह शिगेला पोहचतो.
गेल्या वर्षभरात शिवसेनेतील फुटीनंतर जी राजकीय समीकरणे तयार झाली ती अजितदादांच्या बंडानंतर पुन्हा बदलली. शेखर निकम आहे तिथेच राहिले असते तर विद्यमान आमदार म्हणून त्यांचा दावा राहिला असता आणि उबाठाचा उमेदवारीचा प्रश्नच उद्भवला नसता. सदानंद चव्हाण हेही मूळ ठिकाणी सक्रिय राहिले असते तर भास्करराव जाधव यांना चिपळूणमध्ये लक्ष घालण्याची वेळ आली नसती किंवा तशी गरज भासली नसती. मात्र सद्य स्थितीत ठाकरे गटाकडे कोकणात तरी आमदार भास्कर जाधव यांच्या ताकदीचा नेता नाही. वेळप्रसंगी स्वतःचा, मुलाचा विचार न करता गुहागरमध्ये सचिन कदम आणि चिपळूणमध्ये रोहन बने यांच्या रूपाने दोन आमदार निवडून आणण्याचे आव्हान ते स्वीकारू शकतात. पेलू शकतात. उद्धवजीना मुख्यमंत्री करणे हे त्यांचे प्रामाणिक ध्येय आहे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला मग शेंडी तुटो वा पारंबी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे शेखर निकम यांना निवडणूक तेवढी सोपी राहणार नाही. आता त्यांना ‘ नेहमी ‘ मिळणारी रमेश कदम यांची साथ, ताकद भास्कर जाधव यांच्या प्रयत्नांना मिळणार आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही!

जागा कमी… आज आपली सिट बूक करा

भास्करराव यांचा गुहागर व चिपळूणमध्ये आमदारकीसाठी आग्रह नसेल तर त्यांना खासदारकी हाही एक पर्याय आहे. पण तिथे विनायक राऊत यांचे काय करायचे हा प्रश्न आहेच. तेही शक्य झाले नाही तर भास्करराव जाधव यांनी थेट वरिष्ठ नेते म्हणून स्टार प्रचारकाची भूमिका पार पाडणे आणि वरच्या पातळीवरील राजकारणात महत्वाची भूमिका निभावणे याला उद्धवजी प्राधान्य देतील असे वाटते.

टीप…राजकारण इतक्या झपाट्याने बदलत आहे की आजचा अंदाज खोटा ठरू शकतो. कोण कुठल्या गटात जाईल , कोण कोणाशी युती करेल हे साक्षात् ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. त्यामुळे मी तर एक सामान्य माणूस असल्याने हा लेख लिहायला जेवढा वेळ लागला तेवढ्यापुरती तरी आहे ती राजकीय परिस्थिती कायम राहिली तरी आनंद आहे. नंतरचे काही सांगू शकत नाही…

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.