80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महा-पल्स एआय आणि ‘आशा साथी’मुळे कोल्हापूरच्या आरोग्य व्यवस्थेला डिजिटल बळकटी

कोल्हापूर – कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ‘महा-पल्स एआय’ हा राज्यातील पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित जिल्हा आरोग्य कंमाड सेंटर उभारणारा पथदर्शी (पायलट) जिल्हा ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 12 तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, केंद्रे, एकाच डिजिटल व्यासपीठावर जोडली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, महापौर रुपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या थोर स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक, विचारवंत, देशभक्त अशा साऱ्यांचे स्मरण करुन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जिल्हा वासियांना दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन शासन आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. अनेक विकासाभिमूख योजना, उपक्रम प्रामाणिकपणे राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी निश्चित वाटचाल करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत या वर्षा करिता कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल ६९३ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत जिल्ह्यासाठी १३० कोटी ५० लाख इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान मंदिर व परिसर विकास आराखड्यातील १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच श्री क्षेत्र जोतीबा मंदिर व परिसर विकास आराखड्यातील २५२ कोटी रुपयांच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या दोहांमधील कामे प्राप्त-कामे प्रगतीपथावर आहेत.

“आशा साथी” हा जिल्हा परिषद, कोल्हापूरच्या आरोग्य विभागाच्यावतीने आणखी एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. याव्दारे आशा सेविकांचे काम अधिक सोपे आणि जलद प्रभावी होणार आहे. शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा ऐतिहासिक व कर्मचारी हिताचा निर्णय १५ हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी नियमित जिल्ह्यातील सुमारे ४५८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लाभ होणार असल्याचे श्री. आबिटकर यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा जिल्ह्यातील ६ हजार ५०० नागरिकांना दिलासा देण्यात आला असल्याचे सांगून ते म्हणाले, पिंक ओपीडी या उपक्रमांतर्गत आठवड्यातील ठरावीक दिवशी महिलांसाठी विशेष आरोग्य सेवा ग्रामीण भागातील १३ लाखांहून अधिक महिला व मुलींना याचा थेट लाभ होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात अवयवदान जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आपण स्वतः अवयवदान नोंदणी केली असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्कमध्ये अमेरिकेच्या ‘ह्यूस्टन’ शहराच्या धर्तीवर मेडिकल हब उभारण्यात येत असून त्यासाठी ४७३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेंडा पार्कमध्ये ६०० बेडचे सामान्य, २५० बेडचे कॅन्सर आणि २५० बेडचे सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ‘माझे गाव ‘आरोग्य संपन्न गाव’ हा एक महत्वाकांक्षी उपक्रम या अभियानांतर्गत प्रत्येक गावाला आरोग्यदृष्ट्या सक्षम, स्वच्छ व रोगमुक्त बनविण्याचा संकल्प आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये खालावलेली भूजल पातळी आणि पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मोठ्या धरणावर अवलंबून राहण्याऐवजी पाणलोट विकास आणि भूजल पुनर्भरणावर भर दिला जात आहे. यासाठी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देत राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी उभी केली. त्यांच्या जन्मदिवस म्हणजेच २१ ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याअंतर्गत १५ ते २१ ऑगस्ट या दरम्यान जलसंधारण सप्ताहाचे तर १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी २०२७ या दरम्यान जलसंधारण अभियानाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या राज्यव्यापी जनजागृती सप्ताहात सहभागी होवून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देऊ या, असे आवाहन पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी केले.

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करत असून ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची घोषणाही मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच केली आहे. सध्या ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत असून या वर्षाअखेर ९० टक्के आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ३६ कोटी रुपये अनुदान वितरीत तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत गत वर्षी ४३२ प्रकल्पांना २५ कोटी ४४ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, पी.एम. किसान योजनांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २३ व्या हप्त्यापर्यंत एकूण ४ लाख ६० हजार लाभार्थ्यांना एकूण दोन हजार ७० कोटीहून अधिक रक्कम जमा केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत ६७० कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील ३३७ लाभार्थ्यांना ६ कोटी ६३ लाख अनुदान देण्यात आले आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (FFS) ही भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने विकसित केलेली डिजिटल प्रणाली शेतकरी अनुदानित खताचे ऑनलाइन आगाऊ बुकिंग खत वितरण अधिक पारदर्शक, १ लाख २४ हजार शेतकऱ्यांनी ३६ हजार मे. टन खताची उचल झाली आहे. जिल्ह्यात सन २०२५-२६ मध्ये अवकाळी पाऊस, पूर -१४ हजार हेक्टर क्षेत्राचे व ५९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान २६ कोटी ५६ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. ‘एक दिवस बळीराजासाठी’ १३ जुलै रोजी ‘एक दिवस बळीराजासाठी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या दिवशी आपल्यासह जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात १३ जुलै पासून ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ हे युद्धपातळीवर राबविण्यात येत असून गांजा व अमली पदार्थाबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून ९८२२७६६१०० हा संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. ‘शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) धोरण राबविण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि आयटीआय परिसराभोवती 100 मीटरचा परिघ पूर्णपणे व्यसनमुक्त व निर्बंध करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. ‘नशामुक्त वॉर्ड’ तसेच ‘नशामुक्त ग्रामपंचायत’ संकल्पना यशस्वी करणाऱ्यांना शासनाच्यावतीने लवकरच प्रोत्साहनात्मक बक्षिसे देण्यात येतील असेही श्री. आबिटकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहीत चव्हाण, वृंदा भुतडा, निवेष पाटील या खेळांडूनी सुवर्ण, रौप्य पदके प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्याचबरोबर मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर अॅस्ट्रोटर्फ बसविण्यात आले असून अलिकडेच ३२ एकर जागेवर अद्ययावत असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम उभे करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार दर्जेदार क्रिकेट स्टेडीयम उभारण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले, देशात कोणीही बेघर असू नये यासाठी सर्वांसाठी घरे साकारत आहे. जिल्ह्यात ८९ हजार १४१ लाभार्थीना घरकुल मंजूर त्यापैकी ४४ हजार १९६ घरकुले पूर्ण झाली आहे. दीड गुंठ्यापर्यंत सन २०११ पूर्वी झालेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २९ हजार व्यक्तींना लाभ होणार आहे, असे सांगितले.

भूमी अभिलेख विभागासाठी जिल्हा प्रशासनाने ३२ रोवर व ६० लॅपटॉप पुरविल्याने जिल्ह्यात भूमापनाची प्रक्रिया गतिमान जिल्हास्तरावर ५० परवानाधारक भूमापक म्हणून स्थापत्य अभियंत्याची नेमणूक कोल्हापूर व हुपरी शहरासाठी जिल्हा नियोजन समितीने नगर भूमापन करून प्रॉपर्टी कार्ड मिळण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. अशाप्रकारे नगर भूमिधारकांसाठी निधी देणारी कोल्हापूर जिल्हा नियोजन समिती ही महाराष्ट्रातील पहिलीच जिल्हा नियोजन समिती आहे, असेही ते म्हणाले.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये श्री गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रमात तीन लाख श्री गणेश मूर्ती, १ हजार ३५२ ट्रॉली व ३५८ घंटागाडी इतके निर्माल्य संकलन करण्यात आहे. या वर्षीसाठीही प्रदुषण मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. रस्ते अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. जखमींना पहिल्या तासात उपचार मिळणे महत्त्वाचे PM-RAHA-T अंतर्गत पात्र अपघातग्रस्तांना ७दिवसांपर्यंत दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध – अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकांना Rah-Veer योजनेअंतर्गत २५ हजारांचे पारितोषिक व प्रशंसा प्रमाणपत्र नागरिकांनी माणुसकीच्या भावनेतून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण सप्ताहनिमित्त महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर लोगो अनावरण करण्यात आले. यावेळी मृद व जल संधारणासंबंधी शपथ घेण्यात आली.

यावेळी जिल्हा प्रशासनाने सन 2021-22 व 2022-23 या वर्षात विविध खेळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्या खेळांडूना जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2021-22 या वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- श्री. सागर श्रीकांत जाधव- हॉकी, गुणवंत खेळाडू (पुरुष)- श्री. प्रथमकुमार रविंद्र शिंदे- तलवारबाजी, गुणवंत खेळाडू (महिला)- श्रीम. शुभांगी शिवाजी पाटील व श्रीमती जान्हवी ज. सावर्डेकर (थेट पुरस्कार) – पॉवरलिफ्टिंग, गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- श्रीमती अन्नपूर्णा सुनिल कांबळे- पॅरा जलतरण यांना देण्यात आले. तर सन 2022-23 या वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- श्री. संदिप रघुनाथ पाटील- हँडबॉल/फुटबॉल, गुणवंत खेळाडू (पुरुष)- श्री. पृथ्वीराज बाजीराव पाटील- रग्बी, गुणवंत खेळाडू (महिला)- श्रीम. श्लोका श्रीपती शिंदे- तलवारबाजी, गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- श्री. दिपक मोहन पाटील- पॅरा जलतरण या विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

यावेळी इयत्ता 5 व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मधील कु. स्वर्णश्री पाटील, स्वरागिनी केंद्रे, कु. पुर्वा भालेकर व कु. अथर्व वाडकर यांना तर इयत्ता 4 वी 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मधील कु. आदर्श ओऊळकर, शिवम दंडवते, कु. आराध्या दंडवते, कु.देवकी काटकर, कु. समर्थ पाटील व मृणाली जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देवून त्यांचे अभिनंदन केले. शासकीय सेवेतील दिवंगत कर्मचारी/अधिकारी यांच्या वारसाना शासकीय सेवेत समावेशाबाबतची नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद पत्नी, आई/वडील, आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या व्यक्ती, शौर्य पदक विजेते, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, करवीर प्रातांधिकारी मोसमी चौगुले, उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी, मोहिनी चव्हाण, शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, तहसिलदार तेजस्वीनी पाटील, नाथाजी सगट, हनमंत म्हेत्रे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-पालक, नागरिक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.