जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पालकमंत्र्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण… आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांच्या रक्कमेत वाढ करा…

कोल्हापूर (विनायक जितकर) – जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम सुरु असून या कामाला आणखी गती देऊया, असे आवाहन करुन आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता तालुकास्तरीय पुरस्काराची रक्कम 5 हजारावरून 10 हजार रुपये करावी तर जिल्ह्याच्या पुरस्काराची रक्कम 10 हजारावरून 25 हजार रुपयापर्यंत वाढवावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराचे व आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ई सर्व्हिस बुक, पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा, भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीचा ऑनलाईन शुभारंभ पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाला.

पालकमंत्री श्री.आबिटकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणे काम करुन कामातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवावी. कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वजण मिळून काम करुया, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रातील पुरस्कार हा कामाची पोचपावती असून आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा पुरस्कारामुळे मिळते. गुणवत्तेवर आधारित पुरस्कार मिळाल्यास त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी महापुरातून वाट काढत पोहोचलो होतो. त्यानंतरही उत्कृष्ट आमदार, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळणे हे कामाचा आगळावेगळा सन्मान देणारे व आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचे व जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट पद्धतीने सुरु असून ई सर्व्हिस बुक सह विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच येत्या 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 50 हजार लाभार्थ्यांना घरकुल वितरीत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, समाजाला शिक्षित करण्याचे काम पत्रकार करतात. लोकशाहीचा चौथा स्तंभ असे पत्रकारांना म्हटले जाते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत असून जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमुळे पुरस्कारार्थी, अधिकारी कर्मचारी व पत्रकारांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांची माहिती दिली. पशुधनातील लिंग निर्धारित रेत मात्रा पुरवठा व ई सर्व्हिस बुक तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक डिजिटल स्वरूपात ठेवणारी पहिली शासकीय संस्था ठरली आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी संगणक वेब व मोबाईल प्रणालीमुळे जमा खर्च जतन करणे तसेच कर्मचाऱ्यांना अद्यावत विवरणपत्र एसएमएस, ऍप द्वारे ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच 50 हजार घरकुलांचे बांधकाम करताना काही अडचण असल्यास त्याच्या निराकरणासाठी 02313580295 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.