कोल्हापूरच्या रेल्वे विषयक मागण्यांबाबत खासदार धनंजय महाडिक यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी…
कोल्हापूर – सध्या नवी दिल्लीमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी कोल्हापूरचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांनी, रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या सुधारणा आणि नव्या रेल्वे गाड्या याविषयी प्रामुख्याने खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्याशी चर्चा केली.
कोरोना काळात कोल्हापूर ते मुंबई सह्याद्री एक्सप्रेस बंद करण्यात आली. आता कोरोना काळ उलटून कित्येक महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अजूनही सह्याद्री एक्सप्रेस सुरू झालेली आहे. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे, ही बाब खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस तातडीने सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान खासदार महाडिक यांच्याच पाठपुराव्यातून, मिरज ते कोल्हापूर या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मंजूर झाले आहे. मात्र काही कारणास्तव हे कामही रखडले आहे. त्याबाबतही खासदार महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधले.
लवकरच मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू होईल आणि त्यानंतर कोल्हापूरहून आणखी काही नव्या रेल्वे गाड्या सुरू करता येतील, असे आश्वासन नामदार रावसाहेब दानवे यांनी दिले. कोल्हापूर ते मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस अथवा वंदे भारत एक्सप्रेस यासह अन्य काही नवीन मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, यासह कोल्हापूरच्या रेल्वे विषयक मागण्यांबाबत, खासदार महाडिक यांनी नामदार दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
![]() |
![]() |
![]() |