अखेर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले वादग्रस्त ‘विनोद वाईन शॉप’ हटवण्याचे आदेश…
धुळे (गोपाल के. मारवाडी) – येथील मुख्य बसस्थानका जवळील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोरील संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेले ‘विनोद वाईन शॉप’ हे दारूचे दुकान हटवून तात्काळ प्रभावाने स्थलांतरित करण्याचे आदेश उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिले आहेत. आबकारी व उत्पादन शुल्क मंत्री डॉ. शंभूराजे देसाई यांनी मुंबईत मंत्रालयाच्या दालनात झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले.मंत्री शंभुराजे देसाई यांनी संबंधित विभागाने 9 तारखेला दुकान मालक गलानी यांना बोलावून सदर दारू दुकान स्थलांतरित करण्याचे निर्देश द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.या दुकानातील दारूविक्री आजपासून दहा दिवस बंद ठेवावी, असेही मंत्री देसाई यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आझाद समाज पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागे असलेले ‘विनोद वाईन्स’ हे विदेशी दारूचे दुकान हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली 1 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे.3 फेब्रुवारीला उपोषणस्थळी शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्याचवेळी आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या वादग्रस्त ‘विनोद वाईन शॉप’ विरोधात कायमस्वरूपी निर्णय घेण्यासाठी मुंबईत जाऊन मंत्रीस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आपण उपोषणकर्त्यांना दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे गुरुवारी मंत्रालयात शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार डॉ. फारुख शाह यांनी स्वत: मुंबई जाऊन धुळे येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशी कार्यालयातून आणि आंदोलनाचे प्रमुख नेते आनंद लोंढे यांचे ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महत्त्वाच्या बैठकीत भाग घेतला. तसेच मुकुंद शिरसाठ, ॲड.सुमित साबळे, जितेंद्र निकाळजे, कैलास जैस्वाल आदी उपस्थित होते.
या बैठकीत एमआयएम पक्षाचे धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी आंबेडकरी जनतेसह सर्वसामान्य नागरिकांच्या तीव्र भावना ना. शंभुराजे देसाई यांचे समोर मांडल्या. तर उपोषणकर्ते आनंद लोंढे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी हे दारू दुकान हटविण्याच्या मागणीवर भर दिला.त्यामुळे अखेर सरकारने हे दुकान हटवण्याचे आदेश दिले. मंत्री देसाई यांनी उपोषणकर्ते आनंद लोंढे यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शासन निर्णयाची माहिती दिली, बैठकीत दुकान मालकासह सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 10 दिवस दारूचे दुकान तात्काळ प्रभावाने बंद करण्यात यावे आणि 9 फेब्रुवारी रोजी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दुकान मालकाला समोरासमोर बोलवावे. दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश देऊन तात्काळ कारवाई करावी.डॉ. शंभूराज देसाई यांनी जारी केलेल्या आदेशामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेले हे दारू दुकान हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मुख्य बसस्थानक परिसरातील महापुरुषाच्या पुतळ्यामागेच एवढ्या वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेली दारू दुकान संदर्भात आताच प्रशासनाचे डोळे कसे उघडले ? शेवटी कोणीतरी तक्रार करावी आणि वाईटपणा घ्यावा याची प्रशासन आणि सरकार वाट बघत बसते का?असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या विरोधात आजाद समाज पक्षाचे पदाधिकारी व आंबेडकरी जनता आणि सूज्ञ नागरिकांनी आंदोलन सुरू केले. अन्यथा या दारू दुकानाकडे प्रशासन आणखी किती वर्षे डोळेझाक करून राहिले असते कुणास ठाऊक? यासंदर्भात अनेक जागरूक नागरिकांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.
धुळे महापालिका प्रशासनाने अतिक्रमित जागेत असलेले सदरहू दुकान जमीनदोस्त केल्याने हे दारू दुकान वरील ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. पण या स्थानांतरणाला मान्यता कशी मिळाली? यामागे कोणाचा आशीर्वाद होता? कारण परवाना असलेले कोणतेही दारू दुकान अन्यत्र कुठेही सहजपणे हलवता येत नाही. शिवाय सदर वाईन शॉप हे शाळा व शासकीय कार्यालयाच्या संकुलापासून अगदी जवळ आहे.तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याजवळ हे दारू दुकान आहे. कोणत्याही शाळा, महाविद्यालया पासून सुमारे 200 मीटर अंतरावर कोणत्याही दारूच्या दुकानांना परवानगी देता येतनाही. असे शासनादेश आहेत. याचा अर्थ या दुकानमालकाला कोणाचे अभय होते ? असा सवाल आता धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विचारला जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील इतर देशी-विदेशी दारू दुकानांवर काय कारवाई होणार?आणि किती दिवसांत? तसेच शासकीय जागेवर देशी दारूच्या दुकानांना परवाना देता येत नसून त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करून पोलीस प्रशासना विरोधात आता अनेक जागरुक नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती मिळाली आहे.