नाशिक: नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर इलेक्ट्रॉनिक्स हब बनत असतांना येत्या काळात ‘मविप्र’च्या कर्मवीर काकासाहेब वाघ कॉलेजचे माजी तसेच आजी विद्यार्थ्यांचे अनेक स्टार्टअप सुरू झालेले दिसतील. इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटरच्या निवडक विद्यार्थ्यांना त्यासाठी सर्वोतोपरी तयार केले जात आहे.
महाविद्यालयात टेक्निकल प्रेझेंटेशन व कम्युनिकेशन स्किल्स तसेच उद्योग उभारण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते आहे. इलेक्ट्रॉनिक्स हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. इलेक्ट्रॉनिक्सची सध्या सर्वात जास्त मागणी व अॅडमिशन्स आहेत.
इलेक्ट्रॉनिक्सचे माजी विद्यार्थी हे आयडॉल ठरत आहेत कारण आर्थिक उन्नतीने रिस्क घेण्याची त्यांची क्षमता सतत वाढत आहे. इलेक्ट्रॉनिक्समुळे सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी प्रचंड वाढल्या आहेत त्यांचा फायदा घ्यावा. इलेक्ट्रॉनिक्स विभागाची गगनभरारी सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इव्ही बॅटरी, एम्बेडेड सिस्टीम, सायंटिस्ट, टेस्टिंग, डेव्हलपर आदी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकऱ्या मिळवित आहेत तसेच स्टार्ट अप देखील सुरू करीत आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. ‘मविप्र’ क.का. वाघ कला, विज्ञान व वाणिज्य कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाच्या आजी-माजी विद्यार्थी संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आदर्श विद्यार्थी आणि आदर्श प्राध्यापक कसे असतात, किर्तीमान कसे होता येते हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
सध्या इलेक्ट्रॉनिक्स विभाग आघाडीवर असून महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे सहा विद्यार्थी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० टक्के जागांवर एकट्या पिंपळगाव बसवंतच्या मविप्र कर्मवीर काकासाहेब वाघ कॉलेजने बाजी मारत प्रवेश मिळवला अशी माहिती देखील त्यांनी दिली.
*नाशिकची इलेक्ट्रॉनिक्स हब साठी वेगवान वाटचाल: प्रा. बी. के. आहेर*
एक हजार एकर जमीन आणि केंद्र सरकारने मंजूर केलेले सात हजार कोटी रुपये यासह नाशिकची इलेक्ट्रॉनिक्स हब साठी वेगवान वाटचाल सुरू आहे. पृथ्वीवर उपलब्ध रोजगार संधींपैकी ३७ टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार व अर्थार्जन संधी केवळ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी क्षेत्रात असून जगातील एक लाख आर्थिक श्रीमंत लोक हे देखील इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाशी जोडले गेलेले आहेत. अशा वेळी पिंपळगाव बसवंत या ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या सन्मानयुक्त जीवनासाठी झटत आहे.
नाशिक मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट टेस्टिंग लॅब, डिफेन्स प्रोजेक्ट, सेमिकन्डटर चिप बनविण्यासाठी काम सुरू आहे. नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना यांचा सर्वात जास्त संधी असा फायदा होणार आहे. फिनलंड, अमेरिका, जर्मनी आदी असंख्य देशांत इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्राध्यापकांनी घडविलेले विद्यार्थी इंटेल, गुगल, आयबीएम आदी मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या अनेक विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास हा ‘झिरो टू हिरो’ आहे.
0महाविद्यालयातील विद्यार्थी स्वतः आपली स्टार्टअप कंपनी सुरू करण्यासाठी ज्ञान ग्रहण करीत नवीन माहिती समजून घेत आहेत ही विलक्षण आनंददायी बाब आहे असे प्रमुख पाहुणे व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. बी. के. आहेर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. आपल्या ३६ वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स शिकविण्याच्या प्रदिर्घ अनुभवातील कितीतरी जुन्या आठवणी जेष्ठ प्रा. बी. के. आहेर यांनी सांगितल्या.
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत महाविद्यालयाचे विद्यार्थी आर्टिफीशियल इंटेलिजन्स (एआय) तसेच मशीन लर्निंग (एमएल), फिनटेक, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटिक्स, अॅटोमेशन, मेडिकल इंट्रुमेंटेशन, वेअरेबल इलेक्ट्रॉनिक्स ड्रेस, ब्रेन टू मशीन इंटरफेसिंग तसेच इतर एडव्हान्सड् इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मध्ये उपलब्ध संधी व आव्हानांवर उपाय याबाबत मार्गदर्शनपर संवाद चर्चा ही यावेळी झाली.
अभिषेक आहेर, संतोष निफाडे, शिवानी जमदाडे, ऐश्वर्या पवार, संकेत थिटे, प्रांजल थिटे, महेश लोखंडे, संकेत पाटील, नीरज बदवार, कुणाल जाधव, केतन कालोगे, विशाल कुशारे, विक्रांत घाडगे, उज्वला वैश्य, निशांत जाधव, अक्षय शिंदे, अनिकेत निकाळे, निलेश आगळे, नितीन जगदाळे, प्रियांका निकम, राणी जगताप, जी. पी. वीर, धनंजय कडलग, बी. एन कडलग आदी मविप्र क. का. वाघ. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते आणि त्या प्रत्येकानेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ते सध्या कसे योगदान करीत बक्कळ अर्थार्जन करीत आहेत तसेच विविध इलेक्ट्रॉनिक्स संधींबद्दल सखोलपणे माहिती दिली.
जुन्या रम्य आठवणींना उजाळा देत, माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत दिलेली माहिती प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी ठरली. माजी विद्यार्थ्यांनी यापुढे देखील आजी विद्यार्थ्यांना करीयर गायडन्स करण्याची जबाबदारी देखील स्वतः हून घेतली आहे. काही माजी विद्यार्थ्यांनी थेट आपल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची हमी देखील यावेळी दिली.
प्रास्ताविक आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा भगवान कडलग यांनी केले. आभार प्रा. गायत्री वीर यांनी मानले. तर आजी-माजी विद्यार्थी संवाद मेळाव्याचे सुत्रसंचलन प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.