केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेतून कोल्हापूर रेल्वे स्थानकाला मिळाले ४३ कोटी, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश, ६ ऑगस्ट रोजी होणार्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांकडून पाहणी
काेल्हापूरः केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेतून, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार आहे. रविवारी, ६ ऑगस्ट रोजी पुनर्विकास कामांना प्रारंभ होतोय. या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली. पुणे विभागातील १६ रेल्वे स्थानकांच्या सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाच्या पुनर्विकास कार्यक्रमांचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
कोल्हापूर रेल्वे स्थानकाला पुनर्विकास योजनेतून सुमारे ४३.३ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. अमृत भारत योजनेतून कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास व्हावा, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केलाय. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी ४३.३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या भरघोस निधीतून कोल्हापूर रेल्वे स्थानकाचं संपूर्ण रुपच बदलले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभिकरण केले जाईल. तर दुसर्या टप्प्यात अनेक नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेच्या एकूण ३८ स्थानकांचा अमृत भारत योजनेत पुनर्विकासासाठी समावेश करण्यात आलाय. या कामांचा शुभारंभ ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यामुळं रेल्वे विभागाकडून या

कार्यक्रमाच्या नियोजनात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी दक्षता घेतली जातीय. आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे, वाणिज्य प्रबंधक मिलींद हिरवे, अभियंता विकास श्रीवास्तव, स्टेशन प्रबंधक विजयकुमार यांच्यासह अन्य अधिकार्यांनी कोल्हापूरच्या रेल्वे परिसराची पाहणी केली. शुभारंभ सोहळ्यासाठी कोल्हापुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर तयारी सुरु करण्यात आली असून, सुमारे १ हजार लोक बसतील, असा भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. या तयारीची पाहणी इंदुराणी दुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी करुन, स्थानिक प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज टर्मिनसचा हेरिटेज लूक कायम ठेवून, या स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यातून रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळतील. तसेच नव्या मार्गावर रेल्वे गाड्या सुरु होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय. देशात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली. पुनर्विकास कार्यक्रमातून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आकर्षक प्रवेशद्वार, पॅसेंजर लॉबी आणि वेटिंग रुमचे नूतनीकरण, प्लॅटफॉर्मचे मजबुतीकरण आणि सुशोभिकरण, सरकते जिने, फूट ओव्हर ब्रीज, लिफ्ट, दिव्यांग व्यक्तींना सुविधा अशी विविध विकासकामे होणार आहेत. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, समीर शेठ, शिवनाथ बियाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
