इचलकरंजी शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत; पाणीपुरवठ्याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांच्याकडून सादरीकरण
मुंबई – इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर; तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत इचलकरंजी शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत; तसेच तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी सादरीकरण केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृष्णा नदी ही तीन राज्यांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची नदी आहे. कोणत्याही राज्याचे नुकसान न करता संबंधित भागाला आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी इचलकरंजीच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी साठवण क्षमता वाढविण्याचे विविध पर्याय तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या अभ्यासानंतर तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक बाबींचा आढावा घेऊन शासनाकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले. आवश्यक असल्यास बिनव्याजी दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून देण्याचाही विचार केला जाईल. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर वसुली अधिक प्रभावी करावी आणि बांधकाम क्षेत्रातील नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.























































