विनायक जितकर
गारगोटी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना माजी सभापती सुनिल निंबाळकर उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, दत्तात्रय उगले, बाळासाहेब भोपळे आदी मान्यवर…
गारगोटी प्रतिनिधी – श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्री ता. कागल कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता राजश्री शाहू परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी ही परिवर्तन आघाडी निवडून येणे गरजेचे आहे. त्याकरीता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी सभापती सुनील निंबाळकर यांनी केले. ते गारगोटी येथे आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना निंबाळकर म्हणाले की, 60 हजार हून अधिक सभासद असलेल्या बिद्री साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा डाव काही मंडळींनी सुरू केला असून याकरीता प्रत्येक निवडणुकीवेळी सभासद वाढविण्याचा उपाय या मंडळींकडून केला जातो. यामुळे कारखान्याचे मूळ सभासद असणाऱ्या शेतकरी बांधवांचा ऊस कधीही वेळेत जात नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. याउलट जाऊन सत्ताधारी मंडळ मात्र मतांचे राजकारण करण्यासाठी कारखाना प्रत्येक वेळी सभासद वाढवून कारखाना प्रायव्हेट लिमिटेड करण्याच्या डाव करत असून त्याचा हा डाव सुज्ञ सभासद मंडळ हाणून पडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना सुनिल किरोळकर म्हणाले की, सत्ताधारी मंडळी कारखान्यामध्ये एकाधिकारशाही पध्दतीने कामकाज करत असून विस्कटलेला ऊस तोडणी कार्यक्रम, ऊस विकास कार्यक्रमाचा वनवा, ऊस तोडणीसाठी असणाऱ्या सेंटर्सना टाळे ठोकणे हा नित्याचा विषय बनला आहे. कोजन मधील मिळालेला नफा सभासदांना न वाटता स्वत:ची घरे भरण्याचे काम या मंडळींकडून केले आहे. त्यामुळे सुज्ञ सभासदांनी आपली मातृसंस्था असलेल्या बिद्री कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींना केलेल्या चुकीच्या कामाचा पर्दाफाश करून घरी घालवण्यासाठी जोमाने कामाला लागावे.
यावेळी बिद्रीचे माजी संचालक दत्तात्रय उगले, बाळासाहेब भोपळे, युवासेना तालुका प्रमुख विद्याधर परीट, पांगीरे सरपंच मारुती भराडे, भेंडवडे उपसरपंच प्रकाश धुमाळ, रघुनाथ बोटे, माजी सरपंच श्रीधर भोईटे, रामभाऊ शिऊडकर, राजाराम भराडे, शिवाजीराव चोरगे सर, राजेंद्र भारमल, आनंदराव शेवाळे, दिनकरराव चव्हाण, सागर मिसाळ, चंद्रकांत गुरव, मारुती पाटील, बबन निळपणकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.