विचार करायला लावणारा लेख नक्की वाचा : दिव्यांची रोषणाई की फटाक्यांची जीवघेणी आतषबाजी?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

✍🏻 कैलास औघडे विशेष साैजन्य

मित्रांनो, या लेखासोबत जोडलेलं छायाचित्र १३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता आमच्या राहत्या इमारतीच्या खिडकीतून टिपलेलं आहे. म्हणजेच लक्ष्मी-पूजनाच्या नंतरचा दिवशी! नुकतेच पालिकेचे साफसफाई कर्मचारी याच रस्त्याचा दुसऱ्या टोकाला आले होते. नेहमीपेक्षा अधिक प्रचंड प्रमाणात पसरलेल्या, नव्हे अगदी जाणूनबुजून ‘निर्माण’ केल्या गेलेल्या या कचऱ्याला त्याच्या नियोजित ठिकाणी म्हणजेच कचरा भूमीपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांचे छायाचित्र मी घेऊ नाही शकलो, किंबहुना ते घ्यावेसे वाटलेच नाही. कारण या ‘समस्येकडे’ ते किती गांभीर्याने पाहतात की केवळ एक वाढीव काम इतकाच त्यांचा सामान्य समज आहे हाच एक प्रश्न आहे. या छायाचित्रात एक लहान मूल दिसते आहे. ते आमच्या अन् आसपासच्या इमारतींचा कचरा गोळा करण्यासाठी नियुक्त केलेल्या ‘कचरावाल्या’ जोडप्याचे आहे. खरं तर कोरोना काळात अन् नंतरही कित्येकदा याच समाजमाध्यमावर अनेकदा आपले प्रबोधन होऊनही आपण कचरा गोळा करणाऱ्या माणसांना ‘कचरावाला’च म्हणतो! तीही आपल्यासारखी ‘माणसेच’ आहेत हे सोयीस्करपणे विसरतो. खरे कचरावाले आपण! आपण कचरा करतो आणि त्यांना गोळा करायला लावतो. हे कित्येकदा कानीकपाळी सांगूनही आपण तेच शब्द वापरतो. असो.

मला जे वाटतंय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ते एव्हाना तुमच्या लक्षात आले असावे कदाचित. पण अजूनही अनेक तथाकथित सुशिक्षित, तरीही भोळेभाबडे किंवा निर्बुद्ध लोक आहेत या समाजात यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणूनच हा लेखप्रपंच! परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि याच निसर्गाचा एक बुद्धिजीवी घटक म्हणून माणूस अविभाज्य भाग आहे. त्यामुळे हा परिवर्तनाचा अलिखित नियमत्यालाही लागू होतोच, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. हे आपण काही मोजक्याच, पण साध्या उदाहरणांनी समजून घेऊ.

 

पूर्वी ‘अष्टपुत्र सौभाग्यवती’ असा आशीर्वाद विशेषकरून नववधूंस दिला जायचा. पुराणातील कथांमधून तो नेहमीप्रमाणेच डोकं बाजूला ठेवत माणूस कॉपी करता झाला. आज जिथं ‘हम दो हमारे दो’ या न्यायाने कुटुंबे आक्रसत जाऊन आता तर ‘त्रिकोणी’ कुटुंबास प्राधान्य देण्याचा काळ आला आहे, तिथं हा आशीर्वाद थेट कालबाह्य ठरतो. अशाच प्रकारे पर्यावरण रक्षणाचा एक भाग म्हणून (आणि झटपट उरकण्याचे कार्य म्हणूनही) अंत्यसंस्कारासाठी लाकडे जाळण्याऐवजी विद्युतदाहिनीचा वापर बहुतांश ठिकाणी केला जातो. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या नैसर्गिक प्राणवायू -ऑक्सीजन- चा आणि पर्जन्याचा ही पुरवठा वाढावा म्हणून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे ब्रीद आता आपण तोंडपाठ केले आहे. नावाला का होईना, प्रत्येक घरात कृतिशीलतेच्या जोडीने अगदी रुजला नसला,तरी ‘वृक्ष संवर्धनाचा’ विचार किमान पोहोचला आहे. या उदाहरणांवरून आपल्या सहज लक्षात यायला हवे की आपण आधुनिक काळात प्रवेश करताना अनेक रूढी-परंपरांना त्यात काळानुरूप बदल करत स्वीकारलेले आहे. मग दिवाळी सणात बेधुंदपणे आणि बेदरकारपणे फटाक्यांची आतषबाजी आजही आपण का बरं पूर्णपणे रोखू शकलेलो नाही?

पर्यावरणप्रेमींनी प्रदूषणास आळा घालण्यासाठी जीवाच्या आकांताने दिलेल्या हाकेस प्रतिसाद देणे तर दूरच; पण उच्च न्यायालयाने सुध्दा दिलेला आदेश फटाक्यांच्या राखेने माखलेल्या पायांखाली तुडवण्याचा जो मुर्दाड निर्ढावलेपणा समाजात दिसून येतो आहे त्याचे जिवंत उदाहरण आजचे हे छायाचित्र आहे. या छायाचित्रात दिसणारा फटाक्यांच्या जळक्या कागदांचा खच इतरत्र नक्कीच यापेक्षा दुप्पट-तिप्पट दिसून आला असेल याची मला खात्री आहे. हे कशाचे द्योतक आहे? हे असे का घडते आहे? याचा विचार अगदीच होत नाही असे नक्कीच नाही. परंतु असे विचारी जन वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच ठरतील! हा उन्मादी अविचारीपणा उद्या आपल्याच जीवाची होळी करणारा ठरेल अशी पुसटशी शंकाही या आत्ममग्न मुर्दाड जीवांच्या मनास शिवत नाही याचा विषाद वाटतो.

एरवी विद्यार्थ्यांना आणि सामान्य जनांस सुसंस्कारी जीवनाचे आणि फुलणाऱ्या बालमनास घडवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून जीवनात संघर्षरत राहण्यासाठी उपदेशाचे डोस पाजणारेच जेव्हा पर्यावरणसंवर्धनाचा विषय दैनंदिन जीवनातील बिनमहत्त्वाचा विषय म्हणून त्याची कुचेष्टा करत अवहेलना करतात, ‘फटाक्यांशिवाय दिवाळी कसली?’ अशा वल्गना करतात, तेव्हा यांचा दांभिकपणा स्पष्ट दिसून येतो! मात्र तरीही मूग गिळून गप्प बसणाऱ्या समाजाचं काय करावं? हा प्रश्न उरतोच! मग अशिक्षित अर्धवटरावांकडून शहाणपणाची अपेक्षा करणे दूधखुळेपणाचे ठरेल!

या प्रश्नांची उत्तरे वेळीच शोधली नाहीत तर या छायाचित्रात दिसणाऱ्या त्या एकट्या लहानग्यासारखी आपली अवस्था झाल्यासारखी राहणार नाही. तो लहानगा आज आपल्या कचरा गोळा करणाऱ्या आईबापांच्या भविष्यात प्रकाश घेऊन येणारा दिवा असला तरी आपल्यासाठी एक प्रतीकात्मक सतर्कतेचा इशारा आहे. हे असेच चालू राहिले तर आधुनिकतेच्या गप्पा झोडणाऱ्या आणि भारताला महासत्ता बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या, पण विचारांनी मागासलेल्या या निगरगट्ट, बेपर्वा लोकांच्या हाती केवळ आणि केवळ आपल्याच हाताने जाळलेल्या फटाक्यांची राख असेल. ज्यात आपलं अस्तित्व गमावून बसण्याची वेळ आलेली असेल. कदाचित आपल्याच भवतालच्या परिसराला आपल्याच हातांनी नेस्तनाबूत करून या मुलासारखे भयाण एकाकी जगणे वाट्यास येईल. पुढची पिढी एकेका श्वासासाठी मोताद झालेली असेल. तेव्हा जागे व्हा आणि जनजागृती करा! जात, धर्म, भाषा, पंथ वगैरे राजकारण काडीमात्र उपयोगाचे नाही, कारण मानवाचे अस्तित्वच मानवाने पणाला लावलेले आहे. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’; पण जगलो वाचलोच नाही तर? तेव्हा आता मोकळा श्वास घेण्यासाठी पर्यावरणसंवर्धनाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही!!

** कैलास बाजीराव औघडे यांचा अल्पपरिचय जरूर वाचा

कैलास औघडे

*ठिकाण :* भाईंदर, जि. ठाणे

*व्यवसाय :* १) सहा वर्षांपासून शिक्षक म्हणून (तिन्ही प्रमुख भाषा विषय), माध्यमिक विभाग, आदर्श विद्या निकेतन (A.V.N. High School), गुरुकुल ग्रुप ऑफ स्कूल्स, भाईंदर येथे कार्यरत.

२) गेली २० वर्षे ११ वी १२ वी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी मध्ये शिकवणे.

दहा वर्षे एक्सपोर्ट इंडस्ट्री मध्ये नोकरी करत करत अध्यापन. मात्र आता पूर्णवेळ अध्यापन क्षेत्रात.

*आवड:* अभिनय, वैविध्यपूर्ण वाचन, अभिजात संगीत ऐकणे, आणि विविध सामाजिक विषयांवर वेळ मिळेल तसे समाजमाध्यमावर लिखाण करून स्वतःला व्यक्त करणे.

*सामाजिक कार्यात सहभाग :* ‘योगदान फौंडेशन’ , भाईंदर या संस्थेत गेली सात वर्षे कार्यरत. श्री. जनार्दन पेडामकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था जवळपास दहा वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम, वैचारिक परिसंवाद आयोजित करत आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.