सकारात्मक विचारांनी काम करणाऱ्यांचे जाळे तयार करुन समाजात बदल घडवूया – ज्ञानेश्वर मुळे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची बैठक संपन्न…

कोल्हापूर – सकारात्मक विचारांच्या व्यक्तीच समाजात चांगला बदल घडवू शकतात. यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणून सकारात्मक विचारांनी काम करणाऱ्यांचे जाळे तयार करुया. या सर्वांच्या सहकार्य घेवून “चांगुलपणाच्या चळवळी”च्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील गरजू व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे पोहोचवूया, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि भारतीय विदेश सेवेचे माजी वरिष्ठ अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वतीने ‘चांगुलपणाची चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक संवेदनशीलपणे करण्यासाठी तसेच या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन व निवडक सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था (एनजीओ), व्यक्ती यांच्या समन्वयाने काम करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. ज्ञानेश्वर मुळे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सहविचार सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील, चांगुलपणाची चळवळ संस्थेचे राज्य समन्वयक पारस ओसवाल, डी.एम. मुळे फौंडेशनचे माजी अध्यक्ष अनिल नानिवडेकर तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी चांगुलपणाची चळवळ” दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये कार्यरत व्यक्तींना एकत्रित आणून घेण्यात आलेला हा महासंवादाचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक हितासाठी हे काम निरंतर सुरु राहणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कार्यरत व्यक्ती या सकारात्मक विचारांनी समाजासाठी मोलाचं काम करत आहेत. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत जिल्ह्यात आवश्यक दहा क्षेत्रांसाठी काम करण्यात येणार आहे. या घटकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या क्षेत्राशी संबंधित घटकांना सक्षम बनवण्यासाठी शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्यात येतील. कोल्हापूर जिल्हा आदर्श बनवण्यासाठीचा हा संकल्प असून यामुळे शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाज यामधील संवाद अधिक घट्ट होईल. यासाठी प्रथम या घटकातील व्यक्तींना त्या त्या विषयाची माहिती व कायदेविषयक ज्ञान देऊन प्रबोधन करणे व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी सर्वप्रथम या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी प्रशिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रातील वाकबगार, तज्ञ बनायला हवे.

आपला बराच काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक विषयाशी संबंधित संस्थांमध्ये जातो. त्यामुळे या प्रक्रिये अंतर्गत सर्वप्रथम शाळा, कॉलेज, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांमध्ये जागृती करण्याचे काम व्हावे. या क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणून सकारात्मकतेने काम करणाऱ्यांचे जाळे तयार करुया. या सकारात्मक विचारांच्या व्यक्तीच सामाजिक प्रबोधनाने समाजात बदल घडवू शकतात. चांगुलपणाच्या चळवळीच्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या घटकांचे सहकार्य घेऊन आपण पुढे जाऊया, असे सांगून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करुन खऱ्या अर्थाने देशसेवा बजावावी, जेणेकरुन देशाची वाटचाल प्रगतीच्या व महासत्तेच्या दिशेने होईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था प्रामाणिकपणे आणि नेटाने आपले काम अनेक वर्षांपासून करत आहेत. देशाच्या जडणघडणीत आपले योगदान देण्यासाठी शासन, प्रशासनासोबत सर्व अशासकीय स्वयंसेवी संस्था (एनजीओ) ना एकत्र आणून एक कार्यपद्धती निश्चित करुन सर्वांनी या क्षेत्रांमध्ये काम केल्यास निश्चित सकारात्मक बदल जाणवू शकतो. या उद्देशाने ही बैठक घेण्यात आल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनी वाटचाल करणाऱ्या या जिल्ह्यात समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी प्रशासनाचे डोळे, कान आणि हात बनून सामाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढे यावे. त्याचबरोबर या कार्यात अन्य इच्छुकांनाही सोबत घेवून या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे जाळे वाढवावे. हे काम ही निरंतर सुरु राहणारी प्रक्रिया असून त्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करुन त्यानुसार सर्वांनी मिळून कार्यरत रहावे. हे काम केवळ आपापल्या संस्थेपूरते मर्यादित न ठेवता सामाजिक हिताच्या उद्देशाने सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

या बैठकीला उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी निराधार महिला, पुरुष, मुले, भिकारी तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच शाश्वत शेती, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, किशोरवयीन मुली, बालविवाह, एकल पालक परिस्थिती, तृतीयपंथी व्यक्तींच्या समस्या, भटक्या विमुक्त जाती, समुदाय उत्थान, अवयवदान, व्यसनमुक्ती आदी क्षेत्रामध्ये आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सुचवल्या.

या सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्था व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सनियंत्रण करण्यात आले. या सर्व क्षेत्रातील कामाचे नियोजन जिल्हा स्तरावर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी व या विषयांवर काम करणाऱ्या आणि काम करण्यास इच्छुक असणाऱ्या 100 हून अधिक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) चे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व विषयांवर कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि त्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे सहकार्य मिळवण्यासाठी ही सभा घेण्यात आली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.