जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

१९ उद्योजकांचा सहभाग; ४६८ रिक्त पदांसाठी ३०१ उमेदवार उपस्थित, १७१ जणांची निवड

कोल्हापूर – जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. आमदार अमल महाडिक, विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमैय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात सहायक आयुक्त जमीर करीम यांनी रोजगार मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट करत स्वयंरोजगाराच्या विविध संधी तसेच इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ ची माहिती दिली. प्राचार्य महेश आवटे यांनी आयटीआयमधील ३१ विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.

रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या हजारो रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आमदार अमल महाडिक यांनी तरुणांनी स्थानिक रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, तसेच भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात खासदार धनंजय महाडिक यांनी बदलत्या रोजगार बाजारपेठेतील कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शॉर्ट टर्म कोर्सेसद्वारे देश-विदेशात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करत तरुणांनी रोजगार शोधणारे न राहता रोजगार निर्माण करणारे बनावे, असे आवाहन केले.

मेळाव्यात १९ उद्योजकांनी एकूण ४६८ रिक्त पदे अधिसूचित केली होती. मेळाव्यास ३०१ उमेदवार उपस्थित राहिले. त्यापैकी २२१ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. १४१ उमेदवारांची प्राथमिक, तर ३० उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयटीआयचे निदेशक ए. पी. कांबळे यांनी उपस्थित मान्यवर, उद्योजक आणि उमेदवारांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.