महावितरण जनता दरबार मधून अधिकाऱ्यांना निर्देश… ऑनलाईन 91 तर ऑफलाईन पद्धतीने 98 अर्ज सादर…
कोल्हापूर (विनायक जितकर) – सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या. यामध्ये नवीन जोडणी, बिल दुरुस्ती, शेती कनेक्शन आदी विषयांबाबत वीज ग्राहकांचे प्रश्न वा शंकांचे निरसन तात्काळ करा. याकामी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना यामध्ये सामावून घेऊन गतीने कामे पूर्ण करा व केलेल्या कामाचा अहवाल सादर करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित महावितरण कार्यालयाच्या जनता दरबारात ते बोलत होते. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, विद्युत निरीक्षक शकील सुतार, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, डॉ. निता माने, महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होते.
आरडीएसएस सुधारित वितरण क्षेत्र योजनेतर्गत मंजूर व प्रस्तावित कामे यात केंद्र शासन पुरस्कृत योजना, विद्युत हानी कमी करणे, नवीन लिंक लाईन, कंडक्टर बदलणे इत्यादी कामाबाबत त्यांनी आढावा घेतला. आशियाई विकास बँक अनुदानातील प्रस्तावित नवीन सब स्टेशन, नवीन घरगुती कनेक्शन, डोंगरी विकास कार्यक्रम आराखडयातील प्रस्तावित कामे, 11 तालुक्यांचा डीपीआर तयार आहे, नवीन पोल टाकणे, नवीन लाईन टाकणे, मुख्यमंत्री सौर कृषी वीजवाहीनी 2.0 सद्यस्थिती, सौर कृषी पंप, मागेल त्याला सौर कृषी, कुसुंम ब योजना, प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंमलबजावणी, जिल्हा वार्षीक योजनेतील कामांचा आढावा, निरंतर योजना, एसीएफ योजना, तक्रार निवारण प्रणाली अंमलबजावणी, वीज अपघात नुकसान भरपाई सहाय्यता प्रकरणे यासह महापारेषण कडील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. झालेल्या कामांचे लोकार्पण तातडीने करून सुरू कामेही मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, भविष्यात टीओडी मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे वीज दरात फायदा होणार आहे. वीज अपघात, जळीत प्रकरणात पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर द्या, वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पूर बाधित क्षेत्रातील कृषी वीज जोडणी व ७.५ एचपी वरील शेतकऱ्यांना वीजबिल माफी याकरता शासन स्तरावर प्रयत्न करणार, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
यावेळी उपस्थित ग्राहकांच्या तक्रारींना व प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. तर वीज विषयक तक्रारींच्या अनुषंगाने बोलताना सदर तक्रारीं लवकरात लवकर निकाली काढू असे कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी महावितरणच्या वतीने सांगितले. या जनता दरबार करता जिल्ह्यातील एकूण 189 ग्राहकांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर करण्याकरता महावितरणने स्वतंत्र लिंक तयार केली होती. या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन 91 अर्ज सादर झाले व ऑफलाईन पद्धतीने 98 अर्ज सादर झाले. एकूण प्राप्त अर्जांमध्ये नवीन वीज जोडणी, वीज देयके दुरुस्ती, वीज पुरवठा खंडित होण्याबाबत, पारंपरिक वीज जोडणी बाबत, वीज दाब पुरेसा नसले बाबत, शेतीला पारंपरिक वीज जोडणी मिळणेबाबत, शेती पंपाच्या वीज भाराबाबत आदी विषयांवर तक्रारी प्राप्त झाल्या. प्रलंबित तक्रार अर्जांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असे महावितरणकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव आबिटकर यांनी केले. या जनता दरबार करिता जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उप विभागीय अभियंते, विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.