शासन निर्णय प्रसिध्द… कोल्हापूर जिल्हा हा कर्ज परतफेडीमध्ये राज्यात आग्रेसर…
कोल्हापूर प्रतिनिधी – महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कोल्हापूर जिल्हयातील एक वर्षात 2 वेळा पीक कर्ज उचलणारे शेतकरी बांधव प्रोत्साहनपर अनुदान योजनेपासून वंचित राहत होते. या शेतकऱ्यांना सदर योजना लाभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मागणी केली होती. याअनुषंगाने तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीस यश आले असून कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी बांधवांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने सन 2019 साली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रू.50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकरी बांधवांना 646 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. परंतू कोवीड-19 मुळे या योजनेस मर्यादा आली. प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक निकषांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा कष्टाळू व प्रामाणिक असून या शेतकऱ्यांमार्फत वेळेत कर्जाची परतफेड केली जाते. कोल्हापूर जिल्हा हा कर्ज परतफेडीमध्ये राज्यात आग्रेसर आहे. परंतू कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बिले ही वेळत जमा होत नाहीत तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक वर्ष हे 30 जुन आहे. या योजनेमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील के.डी.सी.सी. बँकेमध्ये खाते असणारे शेतकरी आपल्या कर्जाची परत फेड 30 जून पर्यंत करत असतो. यामुळे के.डी.सी.सी. बँकेतील शेतकऱ्यांची कर्जपरतफेड ही 2 वर्षामध्ये दिसत असल्यामुळे त्यांना या योजनाचा लाभ मिळत नव्हाता.
यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 5 मार्च, 2024 रोजी काढलेल्या शासन शुध्दिीपत्रकामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच एकाच वर्षात 2 वेळा कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी बांधवांनी सदर शासन निर्णयानुसार पाठपुरावा करून प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याकमी विशेष सहकार्य केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले आहे.