बदली झाली नाही तर नागरिकांचा उपोषणाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले निवेदन…
धुळे (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील जागरूक नागरिक व ‘शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँक बचाव समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देऊन जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांना तातडीने जिल्हा बदली केली पाहिजे अशी जोरदार मागणी केली. सुमारे दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात लेखी तक्रार दाखल केली होती. अद्याप प्रभारी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांच्या जिल्ह्यातून बदलीचा आदेश निघालेला नाही. या संदर्भात निवेदनकर्त्यांसह अनेक जागरूक नागरिक या मागणी करिता लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.या संदर्भात तक्रारदार नागरिकांना विशेष कर्तव्य अधिकारी, मुख्यमंत्री कक्ष यांच्याकडून काही दिवसांपूर्वी प्राप्त पत्रात म्हटले आहे कि, आपण पाठपुरावा केला असल्याने लवकरच कार्रवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी लवकर न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व जण उपोषणाला बसू, असा इशारा या लेखी पत्राद्वारे तक्रारदारांनी दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून बहुतांश अधिकारी व कर्मचारी नव्या जागेवर रुजू झाले आहेत.परंतु जिल्हा उपसंचालक मनोज चौधरी हे दहा वर्षांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्हा उपसंचालक मनोज चौधरी यांच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर अनेक तक्रारी दाखल असताना सलग दहा वर्षे दुसऱ्या जिल्ह्यात बदली न करता ते धुळे जिल्ह्यातच कार्यरत कसे आहेत? या निवेदनाची एक प्रत ईमेल आणि रजिस्टर्ड टपालाने 1) मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई, 2) महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 3) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, 4) सचिव, सहकार विभाग, मंत्रालय, मुंबई, 4) सहकार आयुक्त, पुणे, 6) विभागीय आयुक्त, नाशिक, 7) विभागीय सहसंचालक, नाशिक या सर्वांना पाठविल्या आहेत. यासोबतच निवेदनात पुढे लिहिले आहे की, जिल्ह्यातील दि शिरपूर मर्चंट्स को-ऑप बँकेचे माजी संचालक व व्यवस्थापनावर अनेक गंभीर तक्रारी दाखल झाल्या असून अनेक तक्रारी प्राप्त होऊनही त्यांच्यावर कारवाई प्रलंबित का आहे? यामागील मुख्यत्वे करून जबाबदार म्हणजे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी हेच आहेत. म.सहकार आयुक्त सो।, पुणे यांच्या लेखी चौकशी आदेशानुसार आणि प्रभारी जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी यांच्याही आदेशानुसार शिरपुर येथील प्रभारी उपनिबंधक श्रेणीचे सक्षम अधिकारी दुसाने यांचेकडून तपासाअंती चौकशी अहवाल जा.क्रमांक 1/शिम बँक/तक्रार अर्ज/तपासणी अहवाल/वर्ष 2024, दिनांक 4 जानेवारी 2024 रोजीच दाखल केलेला आहे.
सदर चौकशी अहवालावर जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी नेहमीप्रमाणे विनाकारण टाळाटाळ करून गुन्हेगारांना वाचवण्याची भूमिका बजावताना दिसत आहेत. तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कार्यवाही करत नाहीत. तपास अहवालात ‘बँक बचाव समिती’ व तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असून करण्यात आलेले अत्यंत गंभीर आरोप खरे ठरले आहेत, मात्र याला जबाबदार असलेल्या व्हाईट कॉलर लोकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे सदर बँक आज अत्यंत गंभीर आर्थिक स्थितीत पोहोचली आहे.म्हणून उपोषण संदर्भात पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवले आहे. जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी यांच्याबद्दल सर्व तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पोहोचल्या नंतरही आता कारवाई झाली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा तक्रारदार ‘बँक बचाव समिती’ व जागरूक नागरिकांनी निवेदनांत दिला आहे ? शासकीय अधिकारी व कर्मचारी बदली अधिनियम 2005 नुसार मनोज चौधरी यांची तत्काळ बदली करण्यात यावी.
अनेक नागरिकांनी त्यांच्याविरुध्द वरिष्ठांना अनेक तक्रारी केलेल्या आहेत की, हे अधिकारी आपल्या पदाचा खुलेआम गैरवापर करीत आहेत. कारण ते एकाच जिल्ह्यात एकाच विभागात एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम करत आहेत. याचीही चौकशी व्हायला हवी. याशिवाय या प्रकरणात शासकीय अधिकारी व कर्मचारी अधिनियम २००५ चीही पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. कारण, मनोज चौधरी हे धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील कुसुंबा गावचे रहिवासी आहेत. जिल्ह्याचा कायमचा रहिवासी असलेला सरकारी अधिकारी त्याच जिल्ह्यात निवडणूक अधिकारी म्हणून कोठेही काम पाहू शकत नाही. तरी तात्काळ संबंधित या अधिका-यांची बदली करुन नागरिकांना न्याय द्यावा. आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्वरित कारवाई करावी. अन्यथा आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आठ दिवसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल. यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन आणि संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. असेही या निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनावर ओंकार चैनसिंग जाधव, गोपाल कन्हैयालाल मारवाडी, मोहन साहेबराव पाटील, डॉ. सरोजताई पाटील, भरत बाजीराव रोकडे,हिरालाल रामराव कोळी (वाकडे), शिवाजी हनुमंतराव बोरसे, रामराव रतन कोळी, योगेंद्रसिंह देवीसिंह पाटील (राजपूत), गणेश नारायण देवरे इ.च्या सह्या आहेत.