विनायक जितकर
शिरोलीजवळ पुराचे पाणी साचून राहणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेऊनच महामार्गाच्या सहापदरी करणाची आणि बास्केट ब्रिजची रचना…
कोल्हापूर – पुणे-बेंगलोर महामार्गावर शिरोलीजवळ तयार होणार्या पुलासाठी भराव टाकून, महामार्गाची उंची वाढवली जाणार असल्याची बातमी आज प्रसिध्द झाली. याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नव्याने तयार होणार्या बास्केट ब्रीजची रचना करताना, पुराचे पाणी पुढे सरकेल, अशी तरतूद केली आहे. तर महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामातही, शिरोली जवळच्या नव्या पुलाखाली एकूण १३ मोरी सदृश्य पॅसेज (बॉक्स कल्वर्ट) बनवले जातील. त्यामुळे पुराचे पाणी तटून रहाणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. कोणताही विकास प्रकल्प राबवत असताना, नागरिकांची गैरसोय किंवा नुकसान होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून पुरेपुर काळजी घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सध्या सातारा ते कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. अशावेळी शिरोली जवळचा महामार्ग, महापूर काळात पाण्याखाली जाऊ नये, यासाठी शिरोली ते पंचगंगा पुलादरम्यान भराव टाकून रस्त्याची उंची ३ मीटरने वाढवली जाणार आहे. त्याबद्दल आज खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर बनणार्या बास्केट ब्रीजसाठी केंद्र सरकारने १७० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. हा भव्य आणि आकर्षक बास्केट ब्रीज बांधताना पुराचे पाणी अडून राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. बास्केट ब्रीजला केवळ दोन बाजूलाच पिलर असल्याने पाणी अडून राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम करताना, पुराच्या पाण्याचा निचरा व्हावा, याचा पूर्ण विचार केला असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
या अंतर्गत तयार होणार्या नव्या रस्त्यासाठी शिरोलीच्या बाजूला दीड किलोमीटरपर्यंत ९ मोरी सदृश्य भुयारी पॅसेज, तर उचगावच्या बाजूला चार मोरीसदृश्य भुयारी पॅसेज बांधले जातील. चार बाय सहा मीटर लांबीरुंदीचे एकूण १३ मोरीसदृश्य पॅसेज तयार होतील. त्यापैकी दोन पॅसेजमधून वाहतूक सुध्दा करता येईल. त्यामुळे महापुराचे पाणी सहज वाहून जाईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.
कोणतीही विकास योजना राबवताना नागरिकांची गैरसोय किंवा नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे हे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे महामार्गावर तयार होणार्या पुलासाठी भराव घालून, शहरात महापुराची तीव्रता वाढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी काळजी करण्याचे कसलेही कारण नाही. तरीही सध्या बनवलेल्या पुलाच्या किंवा महामार्गाच्या रचनेत आणखी काही सुधारणा करणे आवश्यक असेल, तर त्याचाही विचार करु आणि संसदेच्या आगामी अधिवेशनात कोल्हापूरचे तीनही खासदार, नामदार नितीन गडकरी यांना भेटतील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. पुराचे पाणी साचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असा दिलासा खासदार महाडिक यांनी दिला आहे.